– राजेंद्र पातोडे
इतिहासाशी प्रतारणा करत, कथित ‘संस्कारां’चा राजकीय मुखवटा घालून सार्वजनिक जीवनात कोल्हाटउड्या मारणाऱ्या नेत्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भर घातली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणावर समर्थ रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव होता, असे बिनडोक विधान करून त्यांनी केवळ ऐतिहासिक अज्ञानच प्रकट केले नाही, तर एका महामानवाच्या वैचारिक संघर्षाचे पद्धतशीर ‘भगवेकरण’ करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार म्हणजे निव्वळ ‘बौद्धिक दिवाळखोरी’ नसून, सवंग लोकप्रियतेसाठी मारलेली एक केविलवाणी ‘बेडूक उडी’ आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण आयुष्य हे तर्कशुद्ध विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रस्थापित धार्मिक विषमतेविरुद्धचा लढा आहे. ज्यांनी विषमतेचे पोषण करणाऱ्या ग्रंथांचे चिकित्सक विश्लेषण करून समाजाला प्रज्ञेची वाट दाखवली, त्यांच्याच जडणघडणीचे श्रेय ‘मनाचे श्लोक’सारख्या परंपरागत रचनेला देणे हा एक भयानक विरोधाभास आहे. हे विधान म्हणजे बाबासाहेबांनी आयुष्यभर ज्या वैचारिक गुलामीविरुद्ध संघर्ष केला, त्याच चौकटीत त्यांना पुन्हा बंदिस्त करण्याचा एक छुपा अजेंडा आहे.
पेडणेकर आज ‘मनाचे श्लोक’ शालेय स्तरावर सक्तीचे करण्याची वकिली करत आहेत. मात्र, मुंबईच्या महापौरपदाच्या शक्तिशाली खुर्चीवर बसल्या असताना त्यांना हे ‘संस्कारांचे शहाणपण’ सुचले नाही. तेव्हा मुंबईतील मराठी शाळांची गळती, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रमाचा दर्जा सुधारण्यापेक्षा, महापालिकेत कंत्राटे देताना गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय या विशिष्ट वर्गाला ‘लुटीचा परवाना’ देण्यातच ही मंडळी मग्न होती. मराठी माणूस आणि मराठी शाळांना देशोधडीला लावून आता ‘संस्कारां’ची पिपाणी वाजवणे हे निव्वळ राजकीय सोंग आहे.
किशोरी पेडणेकर ज्या पक्षाशी संबंधित आहेत, त्या पक्षाची मूळ वैचारिक शिदोरी प्रबोधनकार ठाकरे असायला हवी होती. प्रबोधनकारांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, भिक्षुकशाही आणि सामाजिक दांभिकतेवर कोरडे ओढले.
विद्यार्थ्यांना जर खरोखरच संस्कार द्यायचे असतील, तर प्रबोधनकारांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ किंवा ‘शेतकऱ्यांचे आसूड’ का शिकवले जात नाहीत? प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना अंधश्रद्धा आणि जातीय विषमतेविरुद्ध लढणाऱ्या साहित्याची आठवण व्हायला हवी होती. प्रबोधनकारांचे विचार हे समाजपरिवर्तन करणारे आणि प्रश्न विचारायला शिकवणारे आहेत. पण ते सोडून ‘मनाचे श्लोक’कडे धाव घेणे, यातच यांची वैचारिक कुवत स्पष्ट होते.
कदाचित सुषमा अंधारे यांना अशोक खरात प्रकरणात मिळणारी प्रसिद्धी पाहून निर्माण झालेल्या असूयेपोटी, प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केलेली ही ‘बालिश बडबड’ असावी. सामाजिक संस्कारांची आणि इतिहासाच्या अभ्यासाची सर्वाधिक गरज आज खुद्द किशोरी पेडणेकर यांनाच आहे.
अशा प्रकरणांमध्ये केवळ माफी मागून विषय संपत नाही. प्रश्न आहे तो ऐतिहासिक सत्याशी असलेल्या प्रामाणिकतेचा. मग ते शरद पोंक्षे असोत की किशोरी पेडणेकर ऐतिहासिक तथ्य आणि महापुरुषांच्या नावाने बिनधास्त मुक्ताफळे उधळतात आणि सोशल मीडियावर फटके बसले की माफी मागतात. अशा विकृती म्हणजे ‘वाया गेलेली केस’ असतात. ज्यांना स्वतःला सामाजिक संस्कारांची आणि अभ्यासाची तीव्र गरज आहे, त्यांनी समाजाला संस्कार शिकवू नयेत.
शिक्षण हे मुक्त आणि विवेकाधारित असले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्याऐवजी जुनाट विचार सक्तीने लादणे, हे प्रगत महाराष्ट्राचे लक्षण नाही. पेडणेकर आणि पोंक्षे ही एक प्रवृत्ती आहे. शरद पोंक्षे असोत की किशोरी पेडणेकर ही मंडळी केवळ विधाने करून माफी मागण्यात धन्यता मानतात. वादग्रस्त विधानांनी तेढ निर्माण करायची आणि नंतर माफी मागून पळ काढायचा, हेच करत राहणार. ते सहजासहजी सुधारणार नाहीत.






