हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजु कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ कळमनुरी येथे धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हा हल्ला जातीवादी मानसिकतेतून करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, घटनेला सुमारे दीड महिना उलटूनही हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली नाही, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिस प्रशासनाकडून हल्लेखोरांना जाणीवपूर्वक पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत “जवाब दो, पोलिस प्रशासन जवाब दो” अशा घोषणा देत आंदोलन उभारले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयासमोर कळमनुरी येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. (Hindoli News)
“अभी नहीं, तो कभी नहीं” आणि “जय भीम, जय भारत, जय संविधान” अशा घोषणांनी आंदोलनाची हाक देण्यात आली असून, जातीवादाविरोधात आणि न्यायाच्या हक्कासाठी हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. (Hingoli News)
या आंदोलनाचे आयोजन समस्त वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, माथाडी कामगार आघाडी, समता सैनिक दल तसेच कळमनुरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.





