औरंगाबाद : रमाई आवास योजनेवरून राजकीय वाद पेटला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महानगरपालिके अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या काही नगरसेवकांची नावे घेतल्याने प्रकरण अधिकच तापले आहे. मात्र, या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेत आरोप फेटाळून लावले आहे.
जलील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ यांच्यावर राजकीय द्वेषाने बोट ठेवले होते. खोट्या कागदपत्रांच्या आधारे दलित समाजातील लाभार्थ्यांच्या नावावर प्रत्येकी सुमारे अडीच लाख रुपयांचे अनुदान काढून गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. (Vanchit bahujan aghadi)
या आरोपांना उत्तर देताना अमित भुईगळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी वकिलामार्फत इम्तियाज जलील यांना एक कोटी रुपयांची अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली असून, आरोप सूडबुद्धीने केल्याचे म्हटले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये अपेक्षित मतदान न मिळाल्यामुळे जलील हे दलित समाजावर आणि वंचित गटांवर निशाणा साधत असल्याचेही त्यांनी म्हटले. (Vanchit bahujan aghadi)
भुईगळ यांनी पुढे सांगितले की, ते सातत्याने गोरगरिबांसाठी काम करत असून मतदारांनी त्यांना पुन्हा निवडून दिले आहे. तसेच आंबेडकरी समाजाच्या मोर्चात सहभागी झाल्यामुळे जलील यांना वैयक्तिक राग असल्याचा आरोपही त्यांनी केला.






