औरंगाबाद : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इंधन तुटवड्याच्या अफवांनी शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने मागणी आणि पुरवठ्यात तात्पुरता असमतोल निर्माण झाला. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने इंधन खरेदीवर तात्पुरती मर्यादा लागू केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, दुचाकी वाहनांना आता केवळ २०० रुपयांचे इंधन घेता येणार आहे, तर तीन आणि चार चाकी वाहनांसाठी ही मर्यादा २००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच पेट्रोल पंपांना बाटल्या, कॅन्स किंवा ड्रम्समध्ये इंधन विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना मात्र या आदेशातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्या आवारात इंधनाचा दैनंदिन साठा सर्वसामान्यांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही मर्यादा कायम राहणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने नागरिकांना आवाहन करत स्पष्ट केले आहे की देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. सध्या देशाकडे सुमारे ६० दिवसांचा बफर स्टॉक उपलब्ध असून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. घाबरून जाऊन इंधन खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या अफवा पसरवल्या जात असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.
भारत हा जगातील प्रमुख इंधन शुद्धीकरण करणाऱ्या देशांपैकी एक असून देशांतर्गत इंधनाची उपलब्धता सक्षम आहे. १५० हून अधिक देशांना इंधन निर्यात करणाऱ्या भारताकडे एकूण ७४ दिवसांचा साठा करण्याची क्षमता असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.






