पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करतायत : प्रकाश आंबेडकर
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर टीका केली असून, मोदींचे नेतृत्व कम्प्रोमाईज्ड (तडजोड केलेले) असल्याचा आरोप केला आहे. मोदी अमेरिकेच्या इशाऱ्यावर मुजरा करत आहेत, असा घणाघात केला आहे.
काल मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंतप्रधानांकडून उत्तरदायित्वाची मागणी करण्यासाठी एका भव्य जन-आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सरकारवर गंभीर निशाणा साधला. अलीकडेच एपस्टीन फाईल्सशी संबंधित ई मेल्समध्ये पंतप्रधानांचे नाव आल्याचा आरोप करत, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
अमेरिकेसोबत झालेला व्यापार करार भारतविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, सोर्स कोड शिवाय महागड्या राफेल जेट विमानाची खरेदी केल्याने देशाची धोरणात्मक स्वायत्तता धोक्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, जे काम राष्ट्रीय पक्ष गेल्या १२ वर्षांत करू शकले नाहीत, ते करण्याची हिंमत वंचित बहुजन आघाडीने दाखवली आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनाही धडा घेण्याचा सल्ला दिला.
गेल्या वर्षी औरंगाबाद येथे आरएसएस (RSS) विरुद्ध काढलेल्या मोर्चानंतर, कालच्या मुंबईतील आंदोलनाने मोदी सरकारविरुद्ध जन-आक्रोशाचा पाया रचला आहे, असेही ते म्हणाले.
पंतप्रधानांचे वागणे देशाची सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणारे आहे. हे स्पष्ट संकेत आहेत की त्यांचे नेतृत्व दबावाखाली आहे. असे देखील ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या जन आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी या मुद्द्यावरून अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने केलेल्या आंदोलनानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या आंदोलनाचे पडसाद आता राष्ट्रीय स्तरावरही उमटताना दिसत आहेत. ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणाबाबत जनतेमध्ये संताप असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी समाज माध्यमे आणि इतर व्यासपीठांवरून केली जात आहे.





