– संजीव चांदोरकर
मराठी भाषा
कोणतीही भाषा मजबूत होणे हे काय स्वान्त सुखाय उद्दिष्ट असू शकते का ? ती भाषा बोलणारे बहुसंख्य, आणि त्यांच्या पुढील पिढ्या भौतिक, वैचारिक, भावनिक सर्वार्थाने मजबूत होणे हा त्या भाषेच्या मजबूतपणाचा एकमेव निकष मानला पाहिजे !
व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, स्टॉक मार्केट, जागतिक व्यापार, वित्त भांडवल हे फक्त इंग्रजीत
आणि कथा, कविता, कादंबऱ्या, अनेक प्रकारचे साहित्य मराठी (आणि अनेक प्रांतीय भाषेत)
हि भाषिक श्रमविभागणी कोणी केली ?
आज समाजातील १० टक्के कुटुंबांकडे अर्थव्यवस्थेतील ८० टक्के इन्कम / संपत्ती जमा होत असते. यातील अनेक कोणत्या क्षेत्रातून गडगंज पैसे कमवतात असे विचारले तर तेच उत्तर येईल : व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, स्टॉक मार्केट, जागतिक व्यापार, वित्त भांडवल इत्यादी.
म्हणजे आर्थिक / भौतिक विभागणी आणि भाषिक विभागणी यांचा काहीतरी परस्परसंबंध असला पाहिजे !
मराठी साहित्यात कथा, कांदबऱ्या, नाटके, सिनेमा यातील स्त्री, पुरुष पात्रे जगातील आणि देशातील राजकीय अर्थव्यवस्थेतील (पोलिटिकल इकॉनॉमी) बद्दल उल्लेख येत नाहीत का ? तर येतात. पण गरिबी, दारिद्र्य, विषमता याबद्दल भावनिक व्यक्त होण्यापलीकडे नाही
वाचक / प्रेक्षक याना गदगदून सोडणे एव्हढेच ; कित्ती कित्ती वाईट ना ? ह्युमन ट्रॅजेडी ना ? इतपतच. या लोकांना हे पटवून द्यायची गरज आहे की यातील अनेक प्रश्न तुमच्यावर येऊन आदळणार आहेत. तुमच्या नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या
वाचक / प्रेक्षक याना विचार प्रवृत्त करणे, काहीतरी कृती करावी, आपल्याला कृती जमत नसेल तर जे कृती करत आहेत त्यांना हर प्रकारे मदत करावी असे त्यांना वाटण्यासाठी वरील साहित्य खर्ची पडत नाही
त्यावेळी मराठी भाषा खऱ्या अर्थाने मजबूत होईल, ज्यावेळी कोट्यवधी सामान्य कष्टकरी मराठी भाषिक माणसांना , विशेषतः तरुण तरुणींना त्यांच्या भौतिक आणि आर्थिक प्रश्नांची मुळे नक्की कशात आहेत याबद्दल विचार करायला प्रवृत्त करतील, प्रश्न विचारायला लागतील
आणि कोट्यवधी सामान्य लोकांना प्रश्न पडणे, त्यांना प्रश्न विचारण्याचे धैर्य येणे हि ठोस उत्तरे मिळण्याची पूर्वअट आहे
भाषा मजबूत होणे हे काय स्वान्त सुखाय उद्दिष्ट आहे ? ती भाषा बोलणारे बहुसंख्य भौतिक, वैचारिक, भावनिक सर्वार्थाने मजबूत होणे हा भाषेच्या मजबूतपणाचा एकमेव निकष आहे
शोकांतिका हि आहे कि मराठीतील अनेक कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, सिनेमाकर आणि इतर साहित्यकार यांनी व्यवस्थापन, मॅनेजमेंट, तंत्रज्ञान, स्टॉक मार्केट, जागतिक व्यापार, वित्त भांडवल हे आणि तत्सम विषय कळत्या वयापासून “ऑप्शन”ला टाकलेले असतात. ते त्याच भाषिक बायनरीचे शिकार असतात.
नव्याने लिहू लागलेल्या तरुण शब्द कर्मीकडून खूप अपेक्षा आहेत…कोणताच विषय ऑप्शनला टाकू नका मित्रानो. विशेषतः जे विषय तुमच्या, तुमच्या भावा / बहिणींच्या / कोट्यवधी नागरिकांच्या भौतिक नरक यातनांना कारणीभूत आहेत. प्रस्थापित व्यवस्थेचा सारा गेम भाषेचा / परिभाषेचा आहे. तो नेहमीच तसा राहिला आहे.






