मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईलमध्ये आलेले नाव, अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार ज्यामुळे देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ आंदोलन करण्यात येणार आहे.
१३ फेब्रुवारी रोजी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना पत्र लिहून याविरोधात देश पातळीवर आंदोलन करण्याची मागणी केली होती. त्या पत्रावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्र लिहून या आंदोलनाला समर्थन असल्याचे म्हटले आहे. त्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून फक्त समर्थन पुरेसे नसून यात सहभागी व्हावे तसेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी व्हावे, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. (Prakash ambedkar)
आगामी जनआंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. केवळ तुमचा पाठिंबा पुरेसा नाही, तर काँग्रेसने प्रत्यक्ष मैदानात उतरणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २ मार्च २०२६ रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोर भव्य जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “मुद्रा मोदी ते मुजरा मोदी” असे या आंदोलनाचे नाव दिले आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला जाणार आहे. (Prakash ambedkar)
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी १३ फेब्रुवारी रोजी राहुल गांधींना पत्र लिहिले होते, ज्याला राहुल गांधींनी प्रतिसाद देत उत्तरदायित्व मागण्याच्या विचाराला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, आज पुन्हा पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांनी त्यांना निमंत्रण दिले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या तडजोड केलेल्या नेतृत्वाविरोधात केवळ शब्दांचा पाठिंबा उपयोगाचा नाही. या लढ्यात राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतः सहभागी व्हावे, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘मुद्रा मोदी ते मुजरा मोदी’ या नावाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले की, हे आंदोलन पंतप्रधानांच्या ‘तडजोड केलेल्या’ भूमिकेबद्दल जनतेच्या तीव्र भावनांचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान मोदी हे अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांसारख्या परकीय शक्तींच्या तालावर नाचत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. (Prakash ambedkar)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केवळ राजकीय विरोध नसून देशाची सुरक्षा, अखंडता, स्वायत्तता आणि सार्वभौमत्व टिकवण्यासाठी दिलेली हाक असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर त्यांनी नमूद केले आहे.
या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, आता काँग्रेस या निमंत्रणावर काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





