भावसिंगपुरा येथे ‘माता भीमाई आणि रमाई संयुक्त जयंती सोहळा’ उत्साहात संपन्न
औरंगाबाद : “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जन्म देणाऱ्या माता भीमाई आणि त्यांना शिक्षणात व संसारात खंबीर साथ देणाऱ्या माता रमाई, या दोन्ही महामातांच्या त्यागामुळेच आज भारतातील महिला स्वाभिमानाने आणि सन्मानाने जीवन जगत आहेत. या त्यागनिष्ठा सासू-सुनेची जयंती साजरी करणे ही समस्त बौद्ध महिलांसाठी अभिमानाची बाब आहे,” असे प्रतिपादन ‘रमाई’ मासिकाच्या संपादिका डॉ. रेखा मेश्राम यांनी केले.
त्या स्थानिक भीमनगर, भावसिंगपुरा येथील विपश्यना बुद्ध विहारामध्ये ‘भीमाई महिला मंडळा’च्या वतीने आयोजित माता भीमाई आणि माता रमाई यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात त्या मुख्य वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. संगीता डोंगरे होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून नवनियुक्त नगरसेविका करुणा जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सविता अभ्यंकर, राजकन्या गोंडाने व पूज्य भन्ते यांची उपस्थिती होती. (Aurangabad news)
डॉ. मेश्राम पुढे म्हणाल्या की, माता भीमाई एका श्रीमंत घराण्यातील होत्या, तर रमाई अत्यंत गरीब घरातील. या दोघींनी एकमेकींना कधीही पाहिले नाही, मात्र डॉ. बाबासाहेबांच्या जीवनात दोघींचे स्थान अढळ आहे. त्यांच्या कष्टामुळे आणि पाठबळामुळेच बाबासाहेब भारताची सक्षम राज्यघटना लिहू शकले. या महामातांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे.
नगरसेविका डॉ. करुणा जाधव यांनी आपल्या भाषणात महिलांना संघटित होण्याचे आवाहन केले. “ज्याप्रमाणे आपण बाबासाहेबांची जयंती एकजुटीने साजरी करतो, त्याच उत्साहात माता भीमाई व रमाई यांचीही जयंती साजरी व्हायला हवी. एकजुटीने काम केल्यास मोठे बदल घडवता येतात, हे माझ्या निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले आहे,” असे त्या म्हणाल्या. (Aurangabad news)
कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना राजकन्या गोंडाने यांनी केले. प्रास्ताविक नीलिमा गेडाम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय सारिका ठवरे यांनी करून दिला, तर आभार सुनंदा अवसरमोल यांनी मानले. या सोहळ्याला भावसिंगपुरा परिसरातील विविध कॉलनींमधील शेकडो महिला आणि नागरिक उपस्थित होते.






