सम्यक विद्यार्थी आंदोलना’चा प्रशासनाला इशारा!
नाशिक: नाशिक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर १२५ व्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या मुलींच्या शासकीय वसतिगृह, दुर्गानगर, पंचवटी येथील गंभीर गैरप्रकारांबाबत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने समाजकल्याण विभागाकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. सदर वसतिगृहातील गृहपाल विजयश्री बाबर यांच्यावर जातीयवाद, भ्रष्टाचार, गैरव्यवहार तसेच विद्यार्थिनींवरील मानसिक छळाच्या गंभीर तक्रारी यापूर्वी दिनांक ०८/०९/२०२५ रोजी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर समाजकल्याण विभागाने चौकशी समिती नेमली असून प्राथमिक चौकशीत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र एवढ्या गंभीर प्रकरणात संबंधित गृहपाल यांना केवळ बदली देऊन त्याच पदावर पुणे येथे नियुक्त करण्यात आल्यामुळे विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित पीडित विद्यार्थिनींनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “समाजकल्याण विभाग जर इतका वेळ लावत असेल तर हा कसला समाजकल्याण विभाग?” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. तसेच वसतिगृहातील विद्यार्थिनींचा निर्वाह भत्ता मागील पाच ते सहा महिन्यांपासून प्रलंबित असून आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थिनींना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जागेअभावी १४ ते १५ विद्यार्थिनी लायब्ररीमध्ये राहतात व त्यांच्यासाठी केवळ एकच स्वच्छतागृह उपलब्ध आहे. स्वच्छतेचा अभाव, दुर्गंधी व असुविधांमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
यादरम्यान सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मिहिर गजबे, वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष दीपक (दादा) पगारे, तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे आदित्य निर्भवणे, वैष्णवी पाटील, भूमिका केदारे आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने पुढील ठाम मागण्या करण्यात आल्या आहेत :
▪ चौकशी समितीचा संपूर्ण अहवाल जाहीर करावा व सदस्यांची नावे सार्वजनिक करावीत.
▪ संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी.
▪ श्रीमती विजयश्री बाबर यांना तात्काळ निलंबित करून अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा.
▪ विद्यार्थिनींचा प्रलंबित निर्वाह भत्ता तात्काळ वितरित करावा.
▪ लायब्ररीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींसाठी पर्यायी निवास व्यवस्था करावी.
▪ वसतिगृहातील मूलभूत सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात.
सदर मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.






