मुंबई : गेल्या पंधरा दिवसांपासून मुंबईत रहेजा बिल्डर आणि राहुल जाधव यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी मनसेच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मोठ्या बिल्डरांसमोर मनसेची मराठी अस्मिता गप्प का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. (Vanchit bahujan aghadi)
मनसे नेहमीच ‘मराठी माणूस’ आणि ‘मराठी अस्मिता’ या मुद्द्यावरून राजकारण करते. मात्र, रहेजा बिल्डरकडून छळवणूक होत असलेले राहुल जाधव हे बौद्ध समाजाचे असून ते मराठीच आहेत. मग अशा वेळी मनसेने रहेजाला ‘मनसे स्टाईल’ने धडा का शिकवला नाही,? असा प्रश्न चेतन अहिरे यांनी विचारला आहे.
अहिरे यांनी मनसेच्या भूमिकेवर म्हटले की, मनसे फक्त गरीब अमराठी लोकांना मारहाण करण्यात स्टंटबाजी दाखवते. मात्र, जेव्हा एखाद्या श्रीमंत बिल्डरकडून मराठी माणसावर अन्याय होतो, तेव्हा मनसे मौन बाळगते. मनसे उद्योजक आणि बिल्डरांना पाठीशी घालते आणि केवळ स्टंटबाजीसाठी सामान्य मराठी माणसासमोर नाटक करते. (Vanchit bahujan aghadi)
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह :
राहुल जाधव यांच्या तक्रारीनुसार रहेजा बिल्डरवर अॅट्रॉसिटी (Atrocity Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलीस संबंधित बिल्डरला अटक का करत नाहीत? असा सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. तसेच राहुल जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई रहेजा बिल्डरच्या कार्यालयात गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना ‘बेकायदेशीररित्या’ अटक केल्याचा आरोप वंचितने केला आहे. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने वंचितच्या पदाधिकाऱ्यांना न्याय दिल्याचेही अहिरे यांनी सांगितले. (Vanchit bahujan aghadi)
‘वंचित’ आपल्या स्टाईलने उत्तर देणार :
मुंबईतील सामान्य आणि मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील, असा निर्धार अहिरे यांनी व्यक्त केला आहे. जेव्हा-जेव्हा मुंबईकरांवर अत्याचार होईल, तेव्हा तेव्हा वंचित बहुजन आघाडी आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा थेट इशारा त्यांनी यावेळी दिला.






