नाशिक : नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांनी वेग घेतला असला, तरी नियोजनाच्या अभावामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विशेषतः द्वारका चौफुली येथील कामामुळे वळवण्यात आलेल्या वाहतुकीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी, नाशिक महानगरच्या वतीने आज (दि. १३) पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. (Nashik news)
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे महानगर प्रमुख दिपक अर्जुन पगारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरात सध्या सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत, मात्र यामुळे अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण येत आहे. द्वारका चौफुली बंद असल्याने अवजड वाहतूक इतर रस्त्यांनी वळवण्यात आली आहे, परंतु त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पुरेसे बळ नसल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (Nashik news)
निवेदनातील प्रमुख मागण्या:
– मुख्य चौक आणि पर्यायी मार्गांवर तात्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा.
– वाहतुकीचे नियमन करणाऱ्या पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात.
– रुग्णवाहिका आणि शालेय बसना प्राधान्याने रस्ता मिळेल, याची खात्री करावी.
यावेळी बोलताना दिपक पगारे म्हणाले की, कुंभमेळ्याची कामे शहरासाठी महत्त्वाची असली तरी, सामान्य नाशिककरांचा छळ होता कामा नये. जर येत्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी ठोस पावले उचलली नाहीत आणि कोंडी सुटली नाही, तर वंचित बहुजन युवा आघाडी जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडेल. (Nashik news)
या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी युवराज मनेरे (महासचिव), विजय गायकवाड (संघटक), शिशुपाल गवई (सचिव), सनीजी जाधव, नाना तपासे (उपाध्यक्ष), मनोज उबाळे (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर वाव्हळे (संघटक), राहुल नेटावटे (सचिव) सागर जाधव, आदित्य भालेराव, अमोल तूपलोंढे आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






