– आकाश मनिषा संतराम
मोहन भागवत सध्या ज्या तडफेने माध्यमांसमोर येत आहेत, ते पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते. संघाला आता स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. ही वेळ संघावर कधीच आली नव्हती. कारण संघ नेहमी प्रश्न विचारणारा राहिला, उत्तर देणारा नाही. पण औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनआक्रोश मोर्च्याने हे चित्र उलटं केलं. मोर्च्यात विचारलेला प्रश्न फार मोठा नव्हता. संघाची भारतीय कायद्यानुसार नोंदणी आहे का? असेल तर दाखवा. नसेल तर करा. एवढंच. पण हाच प्रश्न संघाला अस्वस्थ करून गेला. कारण हा सवाल विचारसरणीवर नव्हता, तर अस्तित्वाच्या वैधानिकतेवर होता.
याच प्रश्नानंतर मोहन भागवत संघाची निवड प्रक्रिया सांगू लागले. जात महत्त्वाची नाही म्हणू लागले. संघ कोणाच्याही विरोधात नाही म्हणू लागले. प्रचार नाही, संस्कार आहेत म्हणू लागले. इंग्रजीबाबत भूमिका स्पष्ट करू लागले. भ्रष्टाचाराविरोधात भूमिका सांगू लागले. म्हणजे एकदम सर्व बाजूंनी सफाई सुरू झाली. पण समाज इतका भोळा नाही. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सरळ प्रश्न विचारला आहे. गोलवलकरांच्या ‘बंच ऑफ थॉट्स’मध्ये मांडलेला सांस्कृतिक आराखडा मोहन भागवत मान्य करतात का? हा प्रश्न संघाच्या मुळावर आहे. कारण आज भागवत समावेशकतेची भाषा बोलतात. जर ती खरी असेल, तर जुने विचार चुकीचे होते, हे सांगावं लागेल. आणि जुने विचार योग्य असतील, तर आजची भाषा ही फक्त परिस्थितीनुसार घेतलेली सोय आहे, हे मान्य करावं लागेल.
एकेकाळी कलाकार, चित्रपट, आधुनिक संस्कृती यांची टिंगल करणारी विचारधारा आज त्याच कलाकारांसमोर जाऊन संवाद साधते. पूर्वी ज्यांना हिणवलं, त्यांच्याच प्रसिद्धीचा वापर आज प्रतिमा उभारण्यासाठी केला जातो. हा बदल विचारांचा नाही, तर गरजेचा आहे, हे लोक ओळखत आहेत. भागवत जातनिरपेक्षतेची भाषा बोलतात. पण त्याच वेळी संघाची सुरुवात ब्राह्मणबहुल समाजातून झाली, ही कबुली देतात. मग प्रश्न असा उभा राहतो की इतिहास बदलला आहे का, की फक्त शब्द बदलले आहेत? सुजात आंबेडकरांच्या मोर्च्याने हेच प्रश्न रस्त्यावर आणले. घोषणांपेक्षा कायद्याचा मुद्दा पुढे ठेवला. संविधानाच्या चौकटीत लढा देण्याची शपथ घेतली. ही एक जबाबदारी होती आणि म्हणूनच त्याचा परिणाम झाला.
ॲड. प्रकाश आंबेडकरांनी सावरकर, हिंदू महासभा, पत्री सरकार, ओबीसी हक्क, यूजीसी नियमावली या सगळ्या संदर्भांनी संघाला इतिहासासमोर उभं केलं. आणि इथेच संघ अडखळतो. संघ प्रचार करत नाही, संस्कार करतो असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात संघ प्रत्येक क्षेत्रात पोहोचलेला दिसतो. जनसंपर्क मोहिमा वाढतात. प्रतिमा बदलण्याचे प्रयत्न वाढतात. वाणी एक आणि करणी एक, हे लोकांच्या लक्षात येत आहे.
संघ कोणालाही लक्ष्य करत नाही असं सांगितलं जातं. पण सामाजिक वास्तवात संघाची ओळख एका ठराविक विचारसरणीशी घट्ट जोडलेली आहे. ती ओळख शब्दांनी नाही, वर्तनाने बदलावी लागते. हाच आग्रह वंचित बहुजन आघाडी धरून आहे. आज परिस्थिती अशी आहे की संघाला स्वतःच्या भूतकाळाकडे आणि वर्तमानाकडे एकाच वेळी बघावं लागत आहे. एका बाजूला समावेशकतेची भाषा. दुसऱ्या बाजूला इतिहासातील कठोर भूमिका. एका बाजूला जातनिरपेक्षतेचा दावा. दुसऱ्या बाजूला सामाजिक वास्तव.
वंचित बहुजन आघाडीने जे प्रश्न विचारले, ते समाजाच्या मनात आधीपासून होते. सुजात आंबेडकरांनी त्यांना आवाज दिला. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांना विचारांची धार दिली. आणि म्हणूनच आज संघाला वारंवार बोलावं लागत आहे. मोहन भागवत शांत भाषेत बोलतात. पण त्या शांत भाषेमागे उभे असलेले प्रश्न फार अस्वस्थ करणारे आहेत. समाज आता शब्दांवर नाही, तर वास्तवावर विश्वास ठेवतो आहे आणि म्हणूनच आज संघाच्या बोलण्यात आणि वागण्यात असलेली तफावत उघडपणे दिसू लागली आहे.





