पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि असंघटित कामगारांचे नेते डॉ. बाबा आढाव आज रात्री निधन झाले. पुना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या एका समर्पित युगाचा अस्त झाला आहे.
वैद्यकीय सेवेतून सामाजिक संघर्षाकडे :
डॉ. बाबा आढाव यांचा जन्म १९३६ मध्ये पुण्यात झाला. त्यांनी विज्ञान शाखेत बी.एस्सी. आणि आयुर्वेदात पदवी घेऊन त्यांनी वैद्यकीय सेवेत पदार्पण केले. बाबा आढाव यांनी १९५३ मध्ये घरातच दवाखाना सुरू करून गरीब रुग्णांना मोफत सेवा देण्यास सुरुवात केली. वैद्यकीय सेवा देत असतानाच त्यांनी समाजातील शोषणाची जाणीव झाली आणि ते सामाजिक संघर्षाकडे वळले.
डॉ. आढाव यांची ओळख प्रामुख्याने असंघटित कामगारांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी हमाल पंचायतीशी जोडले जाऊन कामगारांना न्याय मिळवून दिला. तसेच १९६२ ते १९७१ या काळात ते पुणे महानगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी झोपडीवासीयांसाठी ‘झोपडी संघ’ स्थापन केला.
बाबा आढाव यांनी चळवळीत मोठे योगदान दिले. १९५२ च्या अन्नधान्य भाववाढविरोधी सत्याग्रहापासून ते गोवामुक्ती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त परिषद’ स्थापन करून धरणग्रस्तांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून दिला.
एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विषमता निर्मूलन समितीचे प्रमुख कार्य केले. सत्यशोधक चळवळीचे नेते म्हणून दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, अल्पसंख्याक आणि कष्टकरी यांच्या हक्कांसाठी त्यांनी अथक संघर्ष केला.
आणीबाणीतील संघर्ष :
आणीबाणीच्या काळात त्यांनी प्रचंड मेळावे आयोजित केले, ज्यामुळे त्यांना १६ महिने कारावास भोगावा लागला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे’ सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी अंधश्रद्धाविरोधात जनजागृती केली.
आयुष्यभर लोकचळवळीसाठी झटणाऱ्या डॉ. आढाव यांनी ‘संसद बाहेरील कार्यकर्त्यांसाठी सामाजिक कृतज्ञता निधी’ उभारला. महात्मा फुलेंच्या विचारांवर निष्ठा ठेवत त्यांनी ‘सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार’ ही शिकवण जपली. सत्ता मिळाली नसतानाही ते आयुष्यभर समताधिष्ठित लोकशाहीसाठी लढत राहिले. शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास हा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरला आहे.
ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून आदरांजली :
डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ‘एक्स’ (Twitter) हँडलवर ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ॲड. आंबेडकरांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बाबा आढाव गेल्याची अत्यंत दुःखद बातमी समजली. श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ, हमाल, रिक्षाचालक, काच, पत्रा वेचक कामगार, बांधकाम मजूर तसेच असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
महात्मा फुले यांचा सत्यशोधकी विचार पुढे घेऊन जाणारे कृतिशील लढवय्ये कार्यकर्ते म्हणून बाबा आपल्या सर्वांना परिचित होते.
१९७०-८०च्या दशकात महाराष्ट्रामध्ये त्यांनी जातीय भेदभावाला छेद देण्यासाठी ‘एक गाव, एक पाणवठा’ची राबवलेली चळवळ, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित समूहांसाठी त्यांनी दिलेला लढा हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
त्यांच्या निधनाने असंघटित क्षेत्रातील लाखो कामगारांचा खरा आधार हरपला आहे. कामगारांच्या न्यायासाठी त्यांनी दिलेला संघर्ष इतिहासात सदैव जिवंत राहील. त्यांच्या निधनाने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि पुरोगामी चळवळीची मोठी हानी झाली आहे.आंबेडकर परिवार आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बाबा आढाव यांना विनम्र आदरांजली!





