संजीव चांदोरकर
नफांधळे” झालेल्या शेयर मार्केटमधील गुंतवणूकदारांचे सट्टेबाज सदृश्य गुंतवणुकीतून होणारे “नुकसान”
आणि
स्वतःचा काहीही दोष नसतांना क्लायमेट चेन्जमुळे होणाऱ्या अतिवृष्टीमुळे लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त होण्यातून झालेले देखील “नुकसान”
काहीही फरक नाही ?
शेयर मार्केट ज्यावेळी कोसळते त्यावेळी वर्तमानपत्रातील मथळे बघा ; “सेन्सेक्स आठवड्यात अमुक टक्क्यांनी घसरला , गुंतणूकदारांचे १६ लाख कोटींचे नुकसान !
आणि ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती मध्ये लाखो शेतकऱ्यांचे, नागरिकांचे नुकसान होते त्यावेळी बातम्या बघा: तुफान पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ; गारपिटीने शेतीचे नुकसान; चक्री वादळाने कोकणतातील आंबा बागायतदारांचे नुकसान ; अतिवृष्टीने अमुक महानगरात नागरिकांच्या घरांचे / मालमत्तेचे नुकसान; रस्त्यावरील खड्यांमुळे वाहनांचे नुकसान ; कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान इत्यादी
शेयर मार्केटमधील गुंतवणूकदारांचे नुकसान
सेन्सेक्स ज्यावेळी काही हजारांनी वर जातो ; त्यावेळी गुंतवणूकदारच्या संपत्तीत काही लाख कोटींची भर पडत असते , या वाढलेल्या संपत्तीसाठी गुंतवणूकदारानी नक्की काय कष्ट घेतलेले असतात ? जोखीम घेतली ती आंधळ्या नफ्यासाठी , आणि व्हॉलंटरीली ! जेवढ्या सहजपणे सेन्सेक्स वर जाणार , तेवढ्याच सहजपणे खाली पण येऊ शकतो ना ? मग घ्या जबाबदारी !
मथळा असा पाहिजे. गेल्या काही दिवसात गुंतवणूकदारांना फारसे कष्ट न घेता २०० लाख कोटी रुपयांचा नोशनल नफा झाला होता तो आता १६ लख कोटी रुपयांनी नोशनली कमी झाला !
शेतकऱ्याचे , बागायतदारांचे , कुटुंबाचे नुकसान
त्यांनी कष्ट घेऊन , जीवाचे पाणी करून पिकवलेल्या शेतांचे , फुलवलेल्या बागांचे , पै पै साठवून विकत घेतलेल्या आणि सजवलेल्या घरांचे ; ते आपली संपत्ती प्रचंड शारीरिक कष्ट आणि भावनिक गुंतवणुकीतून उभी करतात ; जी त्यांच्या हातात नसणाऱ्या अरिष्टामुळे नष्ट होते. अपघातात जितीजागती माणसे क्षणार्धात मरतात. विद्यार्थ्यांचे आयुष्यभराचे नुकसान होते.
लक्षात घ्या हे खरेखुरे नुकसान असते ; नोशनल नसते
दुसरा मुद्दा.
भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा तोटा त्याच दिवशी साडेतीन वाजता प्रिसाईज रुपयांच्या आकड्यात जगजाहीर होतो
शेतकरी / कुटुंबे / वाहने / विद्यार्थी यांचे , त्यांचा काहीही दोष नसताना जे नुकसान होते त्याची आकडेवारी ढोबळ असते. ती कधीही गोळाच केली जात नाही ; म्हणजे तशा यंत्रणाच नाहीत. त्याचे quantification केले की नुकसानभरपाईच्या मागणीत काही पटींनी वाढ होऊ शकते. शासनाने ठरवले तर नैसर्गिक अरिष्टात नक्की किती नुकसान झाले हे ते खूप कमी वेळात काढू शकतात. त्यापेक्षा टोकन मदत पॅकेज परवडते
तिसरा मुद्दा:
गुंतवणूकदरांचा गुंतवणुकीचा धंदा आहे , धंद्यात नफा किंवा तोटा होत असतो ; या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत , त्या वेगळ्या काढताच येणाऱ्या नाहीत; सेन्सेक्स वर गेला कि नफा होणार आणि खाली आला कि तोटा होणार हे अनुस्यूत आहे
पण शेतकरी शेत लावतो , कुटुंबे घर सजवतात त्यात शेती / घर उध्वस्त होईल हे अनुस्यूत नसते
सगळ्या प्रकारच्या नुकसानीला एकाच प्रकारात टाकणे. शेयरबाजार आणि शेतीक्षेत्रात फरक न करणे यामागील राजकीय अर्थव्यवस्था समजून घेतली पाहिजे ; सर्व नॅरेटिव्ह भाषेतून सेट होते. मग आपण सगळे त्यांना हवा तसाच विचार करू लागतो.
कॉर्पोरेट / वित्त भांडवलशाही सर्व जगावर राज्य करते. अनेक शतके राज्य करते. त्याच्या हातातील सर्वात प्रभावी हत्यार आहे भाषा / परिभाषा.
तरुणांनो, लेबले न लावता राजकीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला पाहिजे. प्रस्थापित व्यवस्थेची , वित्त भांडवलाची भाषा / परिभाषा समजून घ्या आणि त्याचे विच्छेदन करा.
(८ ऑक्टोबर २०२५) जुन्या पोस्टवर आधारीत (अंगावर येऊ शकणाऱ्यांच्या माहितीसाठी. मी शेयर मार्केटच्या डीलींग रूमचा हेड होतो. माझी आजही स्वतःची शेयर्स मध्ये गुंतवणूक आहे ; मुद्दा बौद्धिक प्रामाणिकपणाचा / अप्रामाणिकपणाचा आहे.)