अहिल्यानगर: “छत्रपती शिवाजी महाराज हे समाजाला तोडणारे नव्हे, तर जोडणारे ‘ऐक्याचे’ प्रतीक आहेत. ज्या काळात माणुसकी पायदळी तुडवली जात होती, त्या काळात महाराजांनी अठरा पगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र गुंफून विश्वासाचे स्वराज्य निर्माण केले,” असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर दक्षिण वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी व शहरवासीयांना शुभेच्छा देताना साठे यांनी समाजातील वाढत्या भेदाभेदावर परखड भाष्य केले. आज काही संधीसाधू लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजात भेदाची भिंत उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराजांचा वारसा सांगणाऱ्यांनी आधी त्यांच्यासारखी प्रगल्भ आणि सर्वसमावेशक दृष्टी ठेवली पाहिजे. केवळ शौर्यावर राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या ‘कर्तव्याचा’ आदर्श घेणे ही काळाची गरज आहे. (Chhatrapati Shivaji Maharaj jayanti )
शिवजयंती हा उत्सव द्वेषाचा नसून कृतज्ञतेचा आहे. समाजात विष कालवणाऱ्यांना शिवकालीन ‘ऐक्याने’ आणि संयमाने उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते फैरोज पठाण यांची प्रमुख उपस्थितीत होते. ॲड. योगेश गुंजाळ युवा शहराध्यक्ष, सुधीर ठोबे जिल्हा संघटक, योगेश क्षीरसागर जिल्हा उपाध्यक्ष, देविदास भालेराव, संतोष पवार, रवी भिंगारदिवे, रियाज शेख, संकेत शिंदे यावेळी जिल्हा, शहर आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘रयतेचा राजा, विचार स्वराज्याचा’ हा संदेश जनमानसात पोहोचवण्याचा निर्धार या प्रसंगी करण्यात आला.






