नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आणि तपासातील कथित निष्काळजीपणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड येथील विशेष पोलिस महानिरीक्षक (IG) कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
१३ फेब्रुवारी २०२६ रोजी कळमनुरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या तालुका संपर्क कार्यालयात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी राजू कांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेला जवळपास एक महिना उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तसेच तपासात हिंगोली पोलिस प्रशासनाकडून गंभीर निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
हल्लेखोर ज्या वाहनातून आले होते त्या वाहनाचा मागोवा घेणे, शहरातील सीसीटीव्ही तपासणे आदी महत्त्वाच्या बाबींची चौकशी अद्याप झालेली नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सध्या असलेल्या अधिकाऱ्यांकडून काढून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवावा, तसेच विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करून तपास जलदगतीने करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच आरोपी फरार असल्यामुळे राजू कांबळे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच शस्त्र परवाना मंजूर करावा, अशीही मागणी करण्यात आली. या प्रकरणात कलम ३०७ आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
दरम्यान, सात दिवसांच्या आत आरोपींना अटक न केल्यास यापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात राज्य कमिटी सदस्य अविनाश भोसीकर, महाराष्ट्र नेते अहमद फारूक, इंजि. राज अटकोरे, शंकर महाजन, नगरसेवक प्रशांत इंगोले, नगरसेवक आकाश जोंधळे, के. येस. वने, दीपक मगर, बालाजी सावंत, रवि पंडित, विनोद वाघमारे, प्रकाश कोल्हे, मोहम्मद असलम, इंजी. रोहन पंडित, लंकेश आवटे, जयभीम डोंगरे, राष्ट्रपाल कोकरे यांच्यासह कळमनुरी तालुक्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





