अहिल्यानगर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने अहिल्यानगरमध्ये आपली कंबर कसली आहे. दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा किंवा भाजप वगळून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन मैदानात उतरण्याचा महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.(Vanchit bahujan aghadi)

राज्यात नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर, वंचित बहुजन आघाडीने आता आपला मोर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे वळवला आहे. या बैठकीच्या निमित्ताने, गेल्या निवडणुकीत पक्षाकडून लढलेल्या उमेदवारांचा राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मंदा अडागळे आणि आस्मा शेख यांनी पक्षाची विचारधारा स्वीकारत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. तसेच यावेळी जामखेड नगर परिषदेचे नगरसेविका संगीता भालेराव, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, उत्कर्षा रूपवते आणि महासचिव किसन चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले. (Vanchit bahujan aghadi)

राज्य महासचिव किसन चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “२०१९ पासून कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आज दिसत आहे. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आल्यानंतर आता हीच विजयाची परंपरा ग्रामीण भागात नेण्याचा आमचा निर्धार आहे.” राज्य प्रवक्ते प्रा. अरुण जाधव आणि उत्कर्षा रूपवते यांनीही आगामी काळात ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यावर भर दिला. (Vanchit bahujan aghadi)
या बैठकीस राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, आदिवासी नेते अनिल जाधव, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, मधुकर साळवे, योगेश क्षीरसागर, अजित कुऱ्हाडे, सोमनाथ भैलुमे, फैरोज पठाण यांसह विविध तालुक्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष चोळके यांनी केले, तर आभार प्रसाद भिवसने यांनी मानले.






