मुंबई : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘एपस्टीन फाईल्स’ प्रकरणात आता भारताच्या राजकारणातही तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या प्रकरणात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आल्याने वंचित बहुजन आघाडीने (VBA) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या गंभीर प्रकरणावर भूमिका घेण्यासाठी आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या, २० फेब्रुवारी रोजी मुंबईत वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एपस्टीन फाईलसारख्या गलिच्छ प्रकरणात देशाच्या पंतप्रधानांचे नाव येणे ही देशासाठी शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. मात्र, सभागृहातील प्रमुख विरोधी पक्ष या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अनेक संघटनांनी विरोधी पक्षांकडे आवाज उठवण्यासाठी विनंती केली, परंतु तिथून नकारात्मक प्रतिसाद मिळाला. (Vanchit bahujan aghadi)
बाळासाहेब आंबेडकरांकडे नेतृत्वाची धुरा :
प्रमुख विरोधी पक्षांच्या उदासीनतेमुळे अनेक सामाजिक संघटनांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली असून, या लढ्याचे नेतृत्व करण्याची विनंती त्यांना केली आहे. देशाची प्रतिमा आणि नैतिकतेचा प्रश्न असल्याने याविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Vanchit bahujan aghadi)
या प्रकरणातील पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिनांक २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि केंद्र सरकारला घेण्याची रणनीती स्पष्ट केली जाणार आहे.






