वंचित बहुजन आघाडीचा महानगरपालिकेत सत्ता संपादनाचा निर्धार
लातूर : नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर वंचित बहुजन आघाडीने आता लातूर महानगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने ठाम पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ‘संवाद बैठक’ उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ता संपादनाचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मोठ्या यशामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा उत्साह कायम ठेवत महानगरपालिका निवडणुकीत प्रभावी कामगिरी करण्यासाठी प्रत्येक प्रभागात संघटना अधिक मजबूत करण्याचे स्पष्ट निर्देश ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीवरून आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळाले.

या बैठकीला वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अमोल लांडगे, जिल्हा निरीक्षक शुद्धोधन सावंत, महासचिव रमेश गायकवाड, लातूर जिल्हाध्यक्ष सलीम सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर, जिल्हा महासचिव रोहित सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष नितीन गायकवाड, युवा महासचिव रमेश माने, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, शहर महासचिव आकाश इंगळे, महिला शहराध्यक्ष सुजाता अजनिकर यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीदरम्यान लातूर शहरातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यांसारख्या विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वंचित, उपेक्षित आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांना सत्तेत थेट वाटा मिळवून देण्यासाठी महानगरपालिका निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत यावेळी नेत्यांनी व्यक्त केले.






