यवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण चिंतन बैठक दारव्हा येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी ‘घर तिथे कार्यकर्ता आणि गाव तिथे शाखा’ हा नवा नारा देण्यात आला.
बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक आणि जिल्हाध्यक्ष डी. के. दामोधर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, निवडणुका जिंकण्यासाठी बूथ बांधणी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. दारव्हा तालुक्यात पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रत्येक गावात पक्षाची शाखा आणि प्रत्येक बूथवर सक्रिय कार्यकर्ता असणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी आगामी काळातील कृती आराखडा सादर करून त्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. (Vanchit bahujan aghadi)
या बैठकीचे अध्यक्षपद तालुकाध्यक्ष सदाशिव तायडे यांनी भूषवले. जिल्हाध्यक्षांच्या सूचनांना प्रतिसाद देत, उपस्थित पदाधिकाऱ्यांनी येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत तालुक्यातील विविध गावांमध्ये नवीन शाखा फलकांचे अनावरण करण्याचे आश्वासन दिले. यामुळे तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे वातावरण अधिक सक्रिय होणार असल्याचे चित्र दिसत आहे. (Vanchit bahujan aghadi)
या बैठकीला जिल्हा व तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यामध्ये दीपक जाधव (जिल्हा पदाधिकारी), आजाब मेषेकार, अविनाश गुरुदे, गौतम मुजमुले, जया नाईक, नोगिता माडीशेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम मुजमुले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अविनाश गुरुदे यांनी मानले. या बैठकीमुळे दारव्हा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.






