कचनेर येथील जाहीर सभेत परिवर्तनाचा नारा; युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
औरंगाबाद : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा धडाका सुरू होता. आज पैठण तालुक्यातील कचनेर येथे आयोजित भव्य जाहीर सभेत युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सत्तांतराचा स्पष्ट संदेश दिला. त्यांनी ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्नांवर बोलले. आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि पाणीपुरवठा यांसाठी ‘वंचित’ला संधी देण्याचे त्यांनी आवाहन केले.
सभेला संबोधित करताना सुजात आंबेडकर म्हणाले, गावागावातील आरोग्य यंत्रणा कोलमडलेली आहे, शिक्षणाची गुणवत्ता घसरली आहे आणि युवक बेरोजगारीने त्रस्त आहेत. या प्रश्नांवर फक्त आश्वासन नव्हे, तर ठोस कृती हवी आहे. वंचित बहुजन आघाडी ही केवळ निवडणुकीसाठी नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठी उभी असलेली चळवळ आहे. (Sujat ambedkar)
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात शुद्ध पिण्याचे पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्रांची सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण व्यवस्था आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही वंचित बहुजन आघाडीची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. तुमच्या परिसरातील स्थानिक समस्या जर खऱ्या अर्थाने सोडवायच्या असतील, तर यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या प्रस्थापित राजकारणाने सामान्य नागरिकांना फसवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधित्व हवे असेल, तर वंचित बहुजन आघाडीला बळ द्यावे लागेल. (Sujat ambedkar)
सभेला पक्षाचे प्रवक्ते तय्यब जफर, युवा आघाडीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, अक्षय देहाडे यांच्यासह तालुका व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. या जाहिर सभेत नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.





