श्रीरामपूर : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने निवडणूक रणधुमाळीची तयारी वेगाने सुरू केली असून, संघटन आणि प्रचारयंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांकडूनही सक्रिय पुढाकार घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुका अध्यक्ष डॉ. गौतम विक्रम चित्ते यांनी राहुरी मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार संतोष चोळके यांच्या प्रचारासाठी पक्षनिधी म्हणून ₹२५,००० रुपयांची देणगी दिली.
हा निधी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमामुळे वंचित बहुजन आघाडी निवडणुकीत अत्यंत गंभीरतेने उतरल्याचे स्पष्ट होत असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला आहे. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ही निवडणूक केवळ उमेदवारीची नसून विचारांची, स्वाभिमानाची आणि पर्यायी राजकारण उभे करण्याची लढाई आहे.
डॉ. गौतम चित्ते यांनी दिलेला निधी हा केवळ आर्थिक मदत नसून, वंचितच्या लढ्यावरील निष्ठा, बांधिलकी आणि जिद्दीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. राहुरी विधानसभा मतदारसंघात संतोष चोळके यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते गावोगावी सक्रिय झाले असून, संघटन बळकट करण्यावर भर दिला जात आहे. सामान्य जनतेचा आवाज विधानसभेत पोहोचवण्याचा निर्धार यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित करण्यात आला.
या प्रसंगी प्रदेश महासचिव किसन चव्हाण, प्रदेश प्रवक्ते अरुण जाधव, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, राज्य प्रवक्त्या उत्कृषा रूपवते, जिल्हा महासचिव मधुकर साळवे, जिल्हा युवा महासचिव सुनील वाघमारे, राहता युवा अध्यक्ष विलास अहिरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचा प्रचार अधिक आक्रमक आणि व्यापक पद्धतीने राबवला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.






