इंदोरा मैदानावर जनसागर उसळला!
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची ऐतिहासिक इंदोरा मैदानावर आज सभा पार पडली. नागपुर जिल्ह्यात इंदोरा मैदानात जनसागर उसळला होता. या सभेला नागपूरच्या विविध प्रभागांतील हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून मोठे शक्तिप्रदर्शन केले. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच ‘वंचित’ने नागपुरात घेतलेल्या या आघाडीमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत.
लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. आंबेडकर
सभेला संबोधित करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी आणि भ्रष्ट व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, “संविधानाच्या विरोधात असणारी व्यवस्था म्हणजेच ‘मनुवादी व्यवस्था’ होय. आज देशात ४०० कोटींचे काम ८०० कोटींमध्ये दाखवून सरकारी तिजोरीची उघड लूट केली जात आहे. याच लुटलेल्या पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा आणि लोकशाही यंत्रणांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.”

“एकपक्षीय हुकूमशाही धोक्याची घंटा”
बिहार निवडणुकीच्या अनुभवाचा दाखला देत आंबेडकर पुढे म्हणाले, “जर हीच प्रथा सुरू राहिली, तर भविष्यात राजकीय पक्षांचे अस्तित्व नगण्य होईल. विरोधी पक्ष संपले की देशात ‘एकपक्षीय हुकूमशाही’ यायला वेळ लागणार नाही. तेव्हा सत्ताधारी हवे तसे वागतील आणि त्यांच्याविरोधात लढणे अशक्य होईल. त्यामुळे संघटन जिवंत ठेवणे, हेच संविधानाचे खरे संरक्षण आहे.”
सत्ताधारी होण्यासाठी हीच खरी वेळ!
फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या समुदायाला आवाहन करताना ते म्हणाले, “आपल्याला मिळालेल्या मतांची भीती समोरच्याला वाटली पाहिजे. या विचारांचा माणूस केवळ राजकारणी नाही, तर आता ‘सत्ताधारी’ झाला पाहिजे. ही संघर्षाची वेळ आहे; तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानासोबत आहात की पैशासोबत, हे आता ठरवा. जोपर्यंत संविधानिक व्यवस्था टिकून आहे, तोपर्यंतच वंचित वर्ग सुरक्षित आहे.”
नागपुरात भाजप आणि काँग्रेस यांच्या पारंपरिक लढतीत वंचित बहुजन आघाडीने आपला स्वतंत्र अजेंडा मांडल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. इंदोरा मैदानावरील या विराट सभेने नागपूरच्या राजकीय मैदानात ‘वंचित’ने आपली मोहर उमटवली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.
यावेळी या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. या सभेत इंदिरा सभा घोषणांनी दुमदुमून गेला होता.






