मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात पहिलीपासून हिंदीसक्तीचा विषय तापला आहे. हिंदीबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी याचे पडसाद उमटणार आहेत.
शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून नेण्यास जिल्ह्यातील मंत्र्यांचाच विरोध आहे. हा विरोध डावलून महामार्गाचे काम रेटण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे अधिवेशनात या महामार्गाच्या उपयुक्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारची कोंडी करू शकतात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना निधी देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या पैशांवर मारलेला डल्ला यावरून वाद होऊ शकतो.
या मुद्द्यांवर अधिवेशन गाजण्याची शक्यता –
१) पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
२) मे, जून महिन्यातील पावसाचा मुंबई, पुण्यातील जनजीवनाला बसलेला फटका
३) पुण्यात तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पर्यटकांचा झालेला मृत्यू
४) शेतकऱ्यांप्रति सरकारची असंवेदनशीलता, विविध भ्रष्टाचारांत मंत्र्यांचा हात, हिंदीसक्ती या सर्वांमुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय.