नांदेड : मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात आज सकाळी सुमारे ८:४५ ते ८:४७ दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जमिनीखालील हालचालींमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही ठिकाणी धक्क्यांचा परिणाम इतका जाणवला की घरांवरील पत्रे उडाली आणि जुन्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याच्या घटना घडल्या. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर धाव घेत मोकळ्या जागेकडे गेले. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Also Read : राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
विशेषतः हिंगोली जिल्ह्यात या भूकंपाचा तीव्र परिणाम दिसून आला. घरातील भांडी आणि इतर वस्तू खाली पडल्या, तर अनेक कच्च्या आणि पक्क्या घरांमध्ये भेगा पडल्या. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे असल्याचे समोर आले आहे. (MarathwadaEarthquake)
सुमारे १० किलोमीटर खोलीवर हा भूकंप झाला. या धक्क्यांचे परिणाम आसपासच्या जिल्ह्यांमध्येही दिसून आले. नांदेड शहरातील सिडको, वजीराबाद आणि तरोडा सांगावी भागांसह यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काही भागांमध्येही सौम्य हादरे जाणवले.
Also Read : पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा
सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






