मनमाड: सिकंदराबाद-मनमाड अजंता एक्स्प्रेसचा विस्तार भुसावळपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाडमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाचोरा-भडगाव ग्राहक सेवा संघाच्या वतीने ही गाडी भुसावळपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली असून, या मागणीला वंचित बहुजन आघाडीसह मनमाडकरांनी कडाडून विरोध केला आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांच्या नावे मनमाड रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, गाडी इतरत्र हलवल्यास तीव्र स्वरूपाचे ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे यांनी दिला आहे.
मनमाडचे महत्त्व कमी करण्याचा डाव?
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी मनमाड स्थानकावरून सुटणाऱ्या आणि मनमाडकरांच्या हक्काच्या असणाऱ्या गोदावरी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस व तपोवन एक्स्प्रेस या गाड्यांचा विस्तार करून त्या इतरत्र हलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मनमाड रेल्वे जंक्शनचे महत्त्व सातत्याने कमी केले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
विस्ताराने प्रवाशांची गैरसोय होणार अजंता एक्स्प्रेसमुळे मनमाड हे थेट मराठवाडा आणि दक्षिण भारताशी जोडले गेले आहे. येथील नागरिक, व्यापारी, रुग्ण व सर्वसामान्य प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होतो. जर ही गाडी भुसावळपर्यंत वाढवली, तर मनमाडकरांच्या कोट्यातील जागा कमी होऊन प्रवाशांची प्रचंड गैरसोय होईल.
मनमाडकरांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता जर रेल्वे प्रशासनाने अजंता एक्स्प्रेस भुसावळपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला, तर मनमाडमध्ये तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल आणि उद्भवणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (GM) यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. सदर प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, जिल्हा नेते दिपक साळवे,महासचिव अमोल केदारे, उपाध्यक्ष निलेश निकम, सागर गाडे, संघटक सुनील बागुल, खुशाल थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते.






