Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सांस्कृतिक

आपल्या पहिल्याच कांदबरीत ‘विधान’ शोधता येणे लेखकासाठी अभिमानास्पद; डॉ. रंगनाथ पठारे यांचे प्रतिपादन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 29, 2023
in सांस्कृतिक
0
आपल्या पहिल्याच कांदबरीत ‘विधान’ शोधता येणे लेखकासाठी अभिमानास्पद; डॉ. रंगनाथ पठारे यांचे प्रतिपादन
       

डॉ. पी.टी. गायकवाड यांनी आपल्या यशस्वी वैद्यकीय कारकिर्दीनंतर वयाच्या पासष्टीत पहिली कादंबरी लिहिली आहे. जगणं, जगताना येणारे प्रश्न, वैद्यकीय क्षेत्र आणि इतर क्षेत्र वगैरे समजावून घेत ते आयुष्याला भिडले आणि त्यांनी पाहिलेले-ऐकलेले अनुभवलेले जग ‘हिप्पोक्रेटसच्या नावानं चांगभलं’ या कादंबरीत पावलोपावली दिसते. त्यांच्या या अप्रतिम सुरुवातीबाद्द्ल त्यांचे अभिनंदन! डॉ. गायकवाडांच्या या कादंबरीत तीन खलपुरूष आहेत. जगण्याच्या संघर्षात खस्ता खात, अभावाशी जुळवून घेत ती पात्र पुढे जातात. जगण्याच्या एका टप्प्यावर मात्र ती आपल्या मुळापासून तुटतात. या मुळापासून तुटण्याची वेदनादायी गोष्ट डॉ. गायकवाडांनी यथार्थपणे समोर ठेवली आहे. अगदी ग्लोबल हॉस्पिटल काढूनही सामान्य माणसं दूर जाणं, जगण्यातला खोटेपणा वाढत जाणं. स्वत:च्या कुटुंबाशीही प्रतारणा करणारे लोक याचे चित्रण करत डॉ. गायकवाड पुढे जातात. डॉ. पठारे पुढे म्हणाले, केवळ व्यावसायिक यश आणि जगण्यातील वरवरची सुबत्ता जगण्याला अर्थ येण्यासाठी पुरेशी नाही. अंत:करणात खर्‍याची ज्योत पेटत राहिली पाहिजे हे या कांदबरीचे ‘विधान’ आहे. आपल्या पहिल्याच कांदबरीत ‘विधान’ शोधता येणे-सापडणे ही काही साधी गोष्ट नाही. त्याबद्दल डॉ. गायकवाड यांचे अभिनंदन!

या कांदबरीच्या निमित्ताने भाषेच्या शुचित्वाच्या प्रश्नाचीही आज चर्चा झाली. खरे तर मराठीतील अहिराणीपासून झाडीबोलीपर्यंत कोणतीही बोली ही प्रमाणभाषा होऊ शकते, पण सत्ता कोणाची यावर कोणाची भाषा शुध्द व प्रमाण हे ठरत असते. विविधतेत एकता हे तत्व भाषेलाही लागू आहे. या कादंबरीत शीर्षकातील चांगभलं पासून कादंबरीभर मराठी भाषेची रंगदार, सौष्ठवपूर्ण वेगवेळी रूपे दिसतात. कादंबरीत डॉ. फिलीप अकबर डोईफोडेची सासू जेव्हा अस्सल मराठी शिव्या देते त्यावेळी अश्लील वाटेल अशा सुंदर मराठी भाषेचे आल्हाददायक रूप आपल्याला दिसते.

डॉ. पी.टी. गायकवाड लिखित, लोकवाङमगृह प्रकाशित ‘हिप्पोक्रेटस्च्या नावानं चांगभलं’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. बी.जे.वैद्यकीय महाविद्यालच्या म. गांधी सभागृहात रविवारी विद्रोही सांस्कृतिक चळवळ व डॉ. आंबेडकर मेडीकोज असोशिएशन याच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आरोग्य सेनेचे संस्थापक व ह्दयरोगतज्ञ डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. विद्रोही साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष गणेश विसपुते, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, बी. जे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते रमेश राक्षे, वसंत साळवे, लेखक डॉ.पी.टी गायकवाड मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशींनी केले तर डॉ. दिलीप कसबे यांनी आभार मानले. पुणे शहरसह पिंपरी चिंचवड,नवी मबई, नाशिक, अहमदनगर येथून जवळजवळ 150 हून अधिक प्रतिथयश डॉक्टरांसह सुमारे 550 हून अधिक लोक कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना कादंबरीकार डॉ. पी.टी.गायकवाड म्हणाले, ‘हिप्पोक्रेटस् च्या नावानं चांगभलं’ या कादंबरी शीर्षकातील हिप्पोक्रेटस् हा प्राचीन ग्रीक वैद्य, त्यानं आदर्श आचारसंहिता सांगणारी शपथ लिहली. कार्यकुशलते वरून तुमची प्रसिद्धी व्हावी जाहिरातीवरून नको असे त्याचे मत होते. स्त्रीरुग्ण तपासताना स्त्री नर्स बरोबर असावी म्हणजे म्हणजे विनयभंग वगैरेचे आरोप होणार नाहीत असेही त्याचे मत होते. त्याची आचारसंहिता महत्वाची पण आज त्याचा सर्रास भंग होतो आहे.

गतशतकाच्या शेवटापासून ते एकविसाव्या शतकाच्या पंचविसीपर्यंत आजच्या काळात वैदयकीय क्षेत्रात सर्वसामान्य माणसांचे आर्थिक सामाजिक शोषण कसे होते याचे चित्रण या कादंबरीत आहे. महापालिका, सरकारी हॉस्पिटले, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन सामान्य माणसांचे दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना वैद्यकीय व इतर सर्व व्यावसायिक बांधील राहीले तर या कादंबरी लेखनाचा माझा उद्देश सफल झाला असे मी मानेन असे उद्गार हिप्पोक्रेटस् च्या नावाने चांगभलं या कादंबरीचे लेखक डॉ. पी.टी. गायकवाड यांनी प्रकाशनसमयी काढले. चित्रकार सरदार जाधव यांचे सुंदर मुखपृष्ठ, प्रा. एकनाथ पाटील यांचे विचारगर्भ मलपृष्ठ आणि लोकवाङमय गृह या नामवंत प्रकाशकांनी पुस्तकाची केलेली उत्कृष्ट मांडणी व छपाई त्यामुळे हे पुस्तक सुंदर बनले आहे. त्याबद्दल लेखकांनी त्यांचे आभार मानले.

गणेश विसपुते म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रातले जेव्हा जेव्हा लिहू लागतात तेव्हा साहित्याच्या क्षेत्राचा विस्तार होतो. वेगवेगळ्या जीवनानुभव लोकांसमोर येतात तेव्हा वाचकही प्रगल्भ होत जातो. समाज एकसुरीपणाच्या धोक्यापासून वाचतो. म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रासंदर्भातील ही कादंबरी लिहून डॉ. पी.टी. गायकवाड यांनी महत्वाची कामगिरी केली असल्याचे मत 16 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गणेश विसपुते यांनी मांडले. कोविड महामारीत अनेक जीव गमावले, खरे तर हे या व्यवस्थेचे अपयश आहे. पण त्याची नीट चिकित्सा अजुन झालेली नाही.

हिप्पोक्रेटस् हा पायथोगोरसचा शिष्य होता आणि दैवी अवकृपेने माणसाला आजार होत नाहीत तर निसर्गचक्राचा भाग म्हणून ते होतात असे त्याने स्पष्टपणे प्रतिपादन केले. हिप्पोक्रेटस् ने लिहलेली शपथ आजही महत्वाची आहे. या शपथेचे आपण काय करत आहोत हा प्रश्न या कांदबरीत मध्यभागी आहे. एका परिपूर्ण भौगोलिक तथ्यावर कल्पनेची इमारत व्यवस्थित उभी करण्यात डॉ. पी.टी. गायकवाड यशस्वी झालेले आहेत.

किशोर ढमाले या कादंबरी प्रकाशनानिमित्त बोलताना म्हणाले, विसंगती टिपणे आणि समाजचिकित्सेबरोबर आत्मचिकित्साही करणे हे लेखक म्हणून अधिक उंचीवर नेणारे असते. डॉ. पी.टी. गायकवाड यांनी जात, धर्म, सत्तासंबंध, वासना, पैसा, लैंगिकता यांचे चित्रण करतानाच सर्व क्षेत्राबरोबरच वैद्यकीय क्षेत्र नैतिक अधःपतनाच्या दिशेने जात असेल तरी निदान त्यातील राखीव जागांमधुन पुढे आलेले डॉक्टर्स काय करताहेत का तेही इतरांसारखेच बनले आहेत? असा प्रश्न उभा केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीस्त्रीदास्यअंताच्या लोकशाही क्रांतीचा बुद्धीजीवी वर्ग तयार करण्याच्या रणनितीचा भाग म्हणून राखीव जागांकडे पाहिले होते. तो बुद्धीजीवी कुठे आहे हा प्रश्न कादंबरीत उभा करण्याचे, आत्मचिंतनाचे धाडस डॉ. पी.टी. गायकवाड यांनी दाखवले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील दाता-आश्रीत संबंधाचे चित्रण व नोकरशाही, राजकारणी, डॉक्टर्स, रुग्ण यांचे सत्तासंबंधाचे दर्शन येथे आत्मटिकेसह येते. कुठल्याही जातीधर्माचे असलो तरी जागतिकीकरणाच्या या र्‍हासकाळात आपण कुठे चाललो आहोत? आता मूल्य, नीती, समाजभान यांचे काय होणार असे प्रश्न विचारत पुढे जाणारी ही कादंबरी म्हणजे फुले आंबेडकरी चळवळीने मराठी साहित्याला दिलेली वैशिष्ट्यपूर्ण भेट आहे असे प्रतिपादन किशोर ढमाले यांनी केले.

कादंबरीचे विमोचक डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले की, डॉ. पी.टी. गायकवाड यांची कांदबरी म्हणजे समाजाच्या नैतिक अधःपतनाचा कृष्ण रंगाच्या विविध छटांनी युक्त कॅलिडोस्कोप आहे. वैद्यकीय व्यवसायातील आर्थिक, प्रशासकीय, कौटुंबिक, स्पर्धात्मक भावभावनांचे त्यातील गुंत्याचे बारकाईने केलेले चित्रण आहे. आपल्या व्यवसायात यशस्वी होऊन वेगळ्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकणारी माणसे महत्त्वाची असतात. अशी माणसे समाज एकांगी होऊ देत नाही. समाज एकांगी होण्याचा दिशने गेला तर त्यातून मोदींसारखे हुकुमशहा निर्माण होतात. समाजाची वैविध्यपूर्णता नाकारणार्‍या आजच्या हुकुमशाहीवादी काळात हिप्पोक्रेटस्च्या नावानं चांगभलं सारख्या कांदबर्‍यांची आणि डॉ. गायकवाडांसारख्या लेखकांची गरज अधिक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध ह्दयरोगतज्ञ व आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. अभिजित वैद्य यांनी केले.

या कादंबरीची सुरूवात हिप्पोक्रेटस् च्या भव्य शपथेने होते, अशी शपथ दुसर्‍या कोणत्याही व्यवसायात नाही म्हणून त्यांना काय अनैतिक वागण्याचा परवाना आहे काय? असा प्रश्न विचारून राजकीय, सामाजिक, नैतिकतेची एक शपथ तयार व्हावी आणि तिला फुले-आंबेडकर-गांधी शपथ असे नाव असावे अशी सूचना डॉ. अभिजित वैद्य यांनी केली.


       
Previous Post

प्रबुद्ध भारत व वंचित बहुजन आघाडीला सावळे परिवाराकडून एक लाख रुपये देणगी

Next Post

सावरकर तो बहाना है, अदानी को बचाना है.

Next Post
सावरकर तो बहाना है, अदानी को बचाना है.

सावरकर तो बहाना है, अदानी को बचाना है.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे अभिवादन कार्यक्रम
बातमी

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे अभिवादन कार्यक्रम

by mosami kewat
November 15, 2025
0

औरंगाबाद : शौर्य, प्रतिकार आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन युवा आघाडीच्या पश्चिम विभागातर्फे...

Read moreDetails
COP-30 मधून उघड झालेले सत्य : पर्यावरणाचे रक्षण नव्हे, नफ्याची शर्यत

COP-30 मधून उघड झालेले सत्य : पर्यावरणाचे रक्षण नव्हे, नफ्याची शर्यत

November 15, 2025
बिहार निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य; काँग्रेसने दलित आणि हिंदू मतदारांचा विश्वास गमावला!

बिहार निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य; काँग्रेसने दलित आणि हिंदू मतदारांचा विश्वास गमावला!

November 15, 2025
संविधान सन्मान महासभेच्या तयारीची मुंबईत आढावा बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

संविधान सन्मान महासभेच्या तयारीची मुंबईत आढावा बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले मार्गदर्शन

November 15, 2025
श्रीनगरजवळ पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; 'व्हाईट-कॉलर' दहशतवादी मॉड्यूलकडून जप्त केलेल्या स्फोटकांमुळे ९ जणांचा मृत्यू

श्रीनगरजवळ पोलीस स्टेशनमध्ये भीषण स्फोट; ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलकडून जप्त केलेल्या स्फोटकांमुळे ९ जणांचा मृत्यू

November 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home