कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलिसांनी एका मोठ्या बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये बनावट नोटा भरल्याच्या घटनेनंतर सुरू झालेल्या तपासाने थेट बांगलादेश सीमेपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचले. या कारवाईत, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मलिक अफसरअली शेख (वय ३२) आणि टोनी जहरुद्दीन शेख (वय २३) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
गडहिंग्लजमधील एटीएममधून उघडकीस आले रॅकेट
या प्रकरणाची सुरुवात १७ जून रोजी गडहिंग्लज येथे झाली, जेव्हा आकाश रवींद्र रिंगणे या तरुणाने एटीएममध्ये ५०० रुपयांच्या ३५ बनावट नोटा जमा केल्या. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता, एकामागोमाग एक १० जणांची साखळी समोर आली.
आकाशच्या अटकेनंतर नितीन कुंभार, अशोक कुंभार, दिलीप पाटील, सतीश कणकणवाडी, भरमू कुंभार आणि अक्षय कुंभार यांची नावे पुढे आली. तपासात असेही उघड झाले आहे की, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अशोक कुंभार याने तुरुंगात असताना टोनीच्या वडिलांशी ओळख केली, ज्यामुळे बनावट नोटांच्या तस्करीला सुरुवात झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बनावट नोटांची छपाई बांगलादेशात केली जाते. त्यानंतर, या नोटा सीमेवरून पार्सल स्वरूपात फेकल्या जातात आणि भारतातील हस्तक त्यांना उचलून देशांतर्गत वितरित करतात. या बनावट नोटांचा साठा थेट बेंगळुरूपर्यंत पोहोचवला जात होता. या रॅकेटमध्ये ओडिशाचा तापसकुमार प्रधानही सामील असल्याने, हे संपूर्ण जाळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांमध्ये पसरले आहे. त्यामुळे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना या तिन्ही राज्यांमध्ये जाऊन कारवाई करावी लागली.
या बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये मोठे आर्थिक व्यवहार समोर आले आहेत. १ लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आणल्यास आरोपींना ६० हजार रुपये मोबदला मिळत असे. यातील ४० हजार रुपये बनावट नोटा पुरवणाऱ्याला दिले जात, तर २० हजार रुपये हस्तकांकडे राहत असत. बहुतांश व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जात होते. तपासात १० संशयितांकडून १६.८८ लाख रुपयांचे ऑनलाइन व्यवहार झाल्याचे आढळून आले आहे, यावरून सुमारे ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा या गटाने चलनात आणल्याचा अंदाज आहे.
जर आकाश रिंगणे एटीएममध्ये पैसे भरताना पकडला नसता, तर ही फसवणूक अजून किती काळ सुरू राहिली असती, याचा विचार करणेही कठीण आहे. या घटनेमुळे चलन सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणेसमोर गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.
चौकशी अंतिम टप्प्यात, ४ आरोपींचा शोध सुरू
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ४ आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. या चार आरोपींना अटक झाल्यानंतर संपूर्ण रॅकेटचा शेवटचा टप्पा पूर्ण होईल, असे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक रमेश मोरे, तसेच कर्मचारी रामदास किल्लेदार, दादू खोत, अरुण पाटील, युवराज पाटील आणि प्रशांत शेवाळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध
खामगाव : गाय चोरीच्या आरोपावरून एका बौद्ध तरुणाला निर्वस्त्र करून बेदम मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगावात बौद्ध समाजाने आज वंचित बहुजन...
Read moreDetails