सामाजिक

“अंधे जहाँ के अंधे रास्ते” – घाणीच्या मलब्यात अडकलेल्या मरणप्राय जगण्याची कथा

“काळा मलबा आणि पांढरे पुस्तक यात किती अंतर आहे ते तिला कळलं पाहिजे.” हे वाक्य आहे आपण सोसलेले कष्ट कधीच आपल्या मुलीच्या वाट्याला येऊ नयेत असं वाटणाऱ्या एका बापाच्या तोंडचं. कोणत्याच बापाला आपल्या मुलाने आपल्या सारखे परिश्रम करावेत असं वाटत नसतं हे खरं आहे. पण हा बाप जे काम करतो त्याची लाज त्याला जितकी वाटते त्याहून कैक पटीने जास्त लाज त्याला ते काम करायला लावणाऱ्या आपल्या सारख्या तथाकथित पांढरपेशांना वाटली पाहिजे. आपण एका घाणीच्या साम्राज्यावर आनंदाने जगत असतो आणि त्याची आपल्याला जाण नसते कारण ती साफ करणारा हा असा माणूस असतो ज्याला आपल्या पुढच्या पिढीने ह्या काळ्या मलब्याच्या नरकात कधी उतरू नये असं वाटत असतं. केवळ नाईलाज म्हणून आणि “गटारात उतरणाऱ्याला पोट नसते, खळगी असते,” असं स्वत:लाच समजावत तो लोकांच्या पोटातून निघालेली घाण म्हणजे गटारात साठलेला मैला साफ करण्याचं काम करत असतो. करकचून भोगलेल्या भूतकाळातील भयानकता, भयाण अंधाराने दाटून आलेला वर्तमान काळ आणि प्रत्येक वेळी मृत्यूला इंगादाखवून गटाराच्या बाहेर आलोच तर आजचा दिवस निभावला अशी रोज जगण्याची शाश्वती देत क्षणाक्षणाने पुढे सरकणारा भविष्यकाळ. हेच त्याचं जगणं. यातल्या सर्व वेदना आणि संवेदनांचं विदारक चित्र उभं करतं उर्मी (शिल्पा सावंत) लिखित दिग्दर्शित “अंधे जहाँ के अंधे रास्ते” हे मराठी नाटक.आपल्या आजूबाजूला नाही तर शहरात आपण जिथे राहतोय तिथे आपल्या पायाखालच्या गटारात उतरून ती साफ करणारी माणसं आपण नेहमी पाहत असतो. त्यांना बघून त्यांच्याविषयी 'नागर' तिटकारा दाखवत आपल्या नाकावर हमखास रुमाल येतोच. पण ते लोक आपलीच घाण साफ करत आहेत याची लाज मात्र क्वचितच वाटते. पेशाने वकील असलेल्या संवेदनशील उर्मीने असाच एक बाहेर काढून ठेवलेल्याघाणीचा काळा मलबा एक दिवस पाहिला. तो हलला तेव्हा तो मलबा नसून काळ्या मैल्याने माखलेला माणूस आहे हे तिला समजलं आणि तिला स्वत:चीच लाज वाटली. तिच्या हातातील पांढरे कागद आणि तो काळा मलबा यात दिसलेल्या सामाजिक दरीने ती अस्वस्थ झाली. रूढार्थाने आपण त्यांच्यासाठी काही करू शकत नाही ही बोच होतीच पण हे जगणं लोकांसमोर आलं पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव तिला झाली! तिने आपल्या या पहिल्या नाटकाचा घाट घातला, संशोधनाची सुरुवात केली आणि या नाटकाचा जन्म झाला.  नाटकाची पहिली एकांकिका उर्मीने लिहिली ती ‘मेनहोल’ नावाने. ही एकांकिका ‘अश्वघोष’च्या एकांकिका स्पर्धेत लक्षवेधी ठरली होती. या एकांकिकेचा जीव फारच  लहान होता. म्हणून त्याचा दीर्घांक केला. मग याचं हिंदी नाटकही तिने केलं जे ५९व्या राज्य नाट्य स्पर्धेत उतरवलं होतं. त्याला वेशभूषा आणि रंगभूषेला दुसरं पारितोषिक मिळालं. एकूण सतरा वेळा दुरुस्त करत साकारलेलं हे आताचं नाटक पूर्णपणे व्यावसायिक नाटकाच्या तोडीचं आहे. हे पूर्ण नाटक मंचन होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत उर्मीने आपलं संशोधन सुरू ठेवलं होतं. महानगरपालिकेच्या आणि गटार साफ करण्याचं कंत्राटी काम करणाऱ्या लोकांच्या स्वत: मुलाखती घेतल्या. या विषयावर झालेले अभ्यास, प्रकाशित झालेले रिपोर्ट्स, एनडीटीवीने केलेले काही प्रोग्राम्स यांचा सखोल अभ्यास केला. सरकारने गटार साफ करण्यासाठी सकर म्हणजे घाण ओढून घेणारी मशीन दिलेली आहे. पण अनेक ठिकाणी अगदी मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा सकर उपलब्ध नाहीत. आताच्या गटारांचा आकार पूर्वीच्या गटारांच्या तुलनेत अगदीच लहान असतो. म्हणजे एक माणूस खाली उतरू शकेल एवढ्या व्यासाची ह्या गटारांची तोंडं असतात. त्यामुळे यात कोणी अडकला तर त्याला काढणं मुश्कील होतं. तरीही एखादा कामगार बराच वेळ वर आलाच नाही तर त्याला पाहायला दुसरा जातो, मग तिसरा, मग चौथा सुद्धा. असे तीन चार जण त्या गटारात तयार झालेल्या जीवघेण्या वायूच्या कचाट्यात सापडतात. अशा वेळी त्यांचा कंत्राटदार हात वर करून मोकळा होतो. कधी कधी ते दारू पिऊन गटारात उतरले म्हणून त्यांना वर यायला जमलं नाही असं अत्यंत घृणास्पद कारण सांगून स्वत:च्या अंगावर कोणतेही आरोप घेत नाहीत. काही कामगार दारू पितात, पण ती त्यांची मजबुरी असते. दारू पिऊन जोवर तुम्ही तुमचा मेंदू बंद करत नाही तोवर त्या घाणीत तुम्ही एक सेकंद सुद्धा राहू शकणार नाही. म्हणून सगळे दारू पिऊनच काम करतात असं नाही. अशा कधी तीन तर कधी चार लोकांचा "गटारात गुदमरून मृत्यू" अशा चार ओळींच्या बातम्या येतात... बस्स! यापुढे या लोकांची दखल घेतली जात नाही. पंचविशी तिशीत मृत्यूच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्या या लोकांच्या मागे राहिलेल्या कुटुंबी यांची सुद्धा दखल घेतली जात नाहीत. कारण यातील बहुतांशी कामगार हे कंत्राटी असतात. उर्मीच्या अभ्यासाप्रमाणे या कामात वाल्मिकी किंवा वर्षोनुवर्षे याच प्रकारचं काम करणाऱ्या जातीचे लोकच आजही हे काम करीत आहेत. यांचे कंत्राटदार मात्र मिश्रा आणि पांडे असे परप्रांतीय आणि तेही उच्चवर्णीय असतात. म्हणजे हा दिसतो तसा केवळ वर्गभेद नाही तर जातीभेद सुद्धा आहे! महानगरपालिकेकडून त्यांना हातमोजे, ऑक्सिजनचं नळकांडं, कंदील ह्या वस्तू दिल्या जातात असं म्हणतात, पण ते सर्वांना दिले जात नाहीत. त्या गटारात कार्बन मोनोक्साईड, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड असे प्राणघातक सल्फाईडयुक्त वायू तयार होत असतात. कामगार गटारात उतरण्याआधी माचीसची पेटती काडी टाकून हे वायू जाळून टाकण्याचा एक थोटा प्रयत्न रोज करतात. खरंतर ही स्वत:ला घातलेली समजूत असते कारण असं केल्याने वरचे वायू जाळले जातात ;पण गटाराच्या तळाशी असलेले वायू जळत नाहीत. कारण हे प्राणघातक वायू मैला सतत कुजण्याच्या प्रक्रियेमुळे सतत निर्माण होत असतात. आपल्याला बाहेर येणारा वास हा याच वायूंचा असतो. बाहेर असणाऱ्यांना त्या वासाचा इतका त्रास होतो तर त्या कामगारांचं काय होत असेल! या गटारांची बांधणी जुनी असेल तर लोखंडी सळ्या बाहेर आलेल्या असतात. ह्या अंगाला लागून, रक्तस्त्राव सुरू होऊन, त्यावर तो घाणीचा मलबा लागून, शिवाय संपूर्ण अंग त्या मलब्याने माखलेलं असतं म्हणून तोंड उघडून कोणाला आवाज देता येत नाही म्हणून त्यांचा तिथेच मृत्यू होतो. काही नव्या गटारांची बांधणी ही लांब केलेली असते. यात मलबा सरकण्यासाठी काटकोनाची रचना असते. पण त्या काटकोनातून तो मलबा सरकत नाही. तो त्या कोनाड्यातून खुरप्यासारख्या पंजाने खणून काढावा लागतो. अर्थात हे सर्व काम या वायूंच्या सान्निध्यात करावं लागतं. या मैल्यात गोठ्यांमधील मल:निस्सारण सुद्धा होत असतं. असा मैला फार लवकर कुजतो. याउलट उच्चभ्रू सोसायट्याच्या आणि मॅकडोनाल्ड सारख्या आउटलेट्सच्या आसपासच्या परिसरात जिथे पिझ्झा, बर्गर, पास्ता, चायनीज असे मैदा मिश्रित जंक फूड आणि इतर कॉन्टीनेन्टल पदार्थ खाल्ले जातात त्या परिसरातील गटारातील मैला कडक असतो, तो लवकर कुजत नाही. याचाच अर्थ तो त्याच्या मूळ रुपात असतो आणि तो सुद्धा या कामगारांना साफ करावा लागतो. आला का अंगावर शहारा!! आता हे चक्र फक्त कामगारांचे जीव घेऊन थांबत नाही. जे कामगार यातून वाचतात आणि आपल्या घरी जातात त्यांच्या अंगाला घाणीचा वास असल्यामुळे त्यांचं कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन सुद्धा कात्रीत सापडतं. या कामगारांच्या बायकांना त्यांच्या वासाची सवय झालीच तर त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. पुढे मुलं आपल्या वडिलांना जवळ येऊ देत नाहीत. कामगारांच्या हातापायाची नखं घाणीने काळी पडलेली असतात. त्यांना खरुज, नायटा, हत्तीपाय असे त्वचारोग होतात. यावर औषध पाणी करण्याएवढे पैसे त्यांच्याकडे नसतात. अशा सर्व परिस्थितीच्या रेट्यात सापडलेल्या लोकांची कहाणी म्हणजे उर्मीचं हे ज्वलंत नाटक “अंधे जहाँ के अंधे रास्ते”.या नाटकासाठी उर्मीने अभिनयातील ‘अ’ सुद्धा माहित नसलेले कलाकार निवडले. त्यांना स्वत: प्रशिक्षण दिलं आणि हे नाटक उभं राहिलं. संतोष जाधव, अंकुर घाटगे, श्रेया व्यवहारे, प्रथमेश पवार, तपस्वी विभूते, तन्मय धामणे, साहिल मावलकर, आयुष भोसले, संकेत बागल या सर्व कलाकारांची कामं खूप वास्तव झाली आहेत. रंगभूषेची जबाबदारी सुनील मेस्त्री,  निलेश मेस्त्री यांची तर संयत प्रकाशयोजना सौरभ शेठ यांनी केली आहे.  या नाटकाच्या संकल्पनेपासून, संहिता लेखन, संवाद, दिग्दर्शन, संगीत, वेशभूषा ह्या सर्व बाजू उर्मीनेच सांभाळल्या आहेत. याचा परिपाक म्हणूनच गटारात उतरणाऱ्या कामगारांचं जीवन रंगमंचावर पाहताना अक्षरश: अंगावर काटा येतो. यात लक्षवेधी ठरतो तो गटारात उतरलेल्या मरणोन्मुख अवस्थेतील कामगाराच्या चेहऱ्यावर पडलेला केमोफ्लाज प्रकाश! या पहिल्या वहिल्या नाटकासाठी उर्मीला खंबीर साथ मिळाली ती तिचे पती विनायक साळुंखे यांची. उर्मीचं हे नाटक यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेला उतरलं आहे आणि समीक्षकांची वाहवा सुद्धा मिळवत आहे. या नाटकाच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा. ह्या नाटकातील मुद्दा शासकीय यंत्रणांना माहीत नाही असं तर अजिबात नाही पण ह्या नाटकाला जर प्रतिसाद मिळाला आणि त्यातील मुद्यावर बोललं गेलं तरच जनरेट्याने यात बदल घडेल अशी अशा करूया... --अँजेला पवार

Read moreDetails

शाहू महाराजांनी वंचितांसाठी उघडले शिक्षणाचे महाद्वार !

राजर्षी शाहू महाराज (१८७६-१९२२) हे भारतीय रियासत कोल्हापूरचे राजे होते. ते त्यांच्या काळातील थोर समाजसुधारक म्हणून ओळखले जात. शाहू महाराज...

Read moreDetails

येवल्याची मुक्तिभूमी…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी 'मी हिंदू धर्मात जन्माला आलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही', अशी ऐतिहासिक...

Read moreDetails

पार लिंगी दृश्य मान्यतेच्या वाटेने…

ट्रांसजेंडर (Transgender) पार लिंगी लोक प्राचीन काळापासून जगभरातील संस्कृतीत अस्तित्वात आहेत. यात जगभरातील संस्कृतीत तिचा शोध घेतला, तर ते वेगवेगळ्या...

Read moreDetails

वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होती

जयभीम चित्रपटाने एक नवी उंची गाठली आहे.ज्याचे खुनाची देखील चर्चा होत नाही.ज्यांना माणूस म्हणून व्यवस्थेने अदखलपात्र करून टाकले आहे, अश्या...

Read moreDetails

सोलापुरातील कोरे कुटुंबियांचा समाजापुढे आदर्श; मृत मुलीच्या स्मरणार्थ प्रबुद्ध भारत पाक्षिकास आर्थिक मदत !

सोलापूर - सोलापूर येथील प्रतिष्ठीत डॉक्टर दाम्पत्य डॉ. सुरेश कोरे आणि डॉ. ज्योत्यास्ना कोरे यांची सुपुत्री विशाखा उर्फ सपना सुरेश...

Read moreDetails

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर आणि डाव्यांचे फसलेले आकलन.

मार्क्सवादी विचारवंत व कार्यकर्ते आंबेडकरवाद्यांवर पोथिनिष्ट असल्याचा जो आरोप करतात तो अत्यंत हास्यास्पद आहे. मुळात आंबेडकरवादाची दास कॅपिटल प्रमाणे एक...

Read moreDetails

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतरामागची लोकशाहीवादी भुमिका

धर्मांतरानंतर थोड्याच अवधित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निर्वाण झाल्यामुळे देशातल्या तमाम शोषित, वंचित समुहांना धम्मदीक्षा देण्याचे त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले. धर्मांतरानंतर आपले...

Read moreDetails

गरज नसता जाती धर्माचा रकाना का ?

अनुसूचित जाती ,जमाती व इतर मागासवर्गीय यांना आरक्षण जरूर आहे पण ज्यांना आरक्षण नाही त्यांचीही जात कागदोपत्री विचारल्या जाते, तसेच...

Read moreDetails

वास्तव आणि प्रतिनिधित्व

मानवाचा आधुनिक इतिहास या वळणावर एक भय-चित्रपट बनत आहे. कार्यकारणभाव परिणामशून्य झाला आहे आणि तर्क अर्थहीन. दररोज आपले मित्र, नातेवाईक...

Read moreDetails
Page 11 of 13 1 10 11 12 13
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

जामखेड येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषद, सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

‎‎जामखेड : भटक्या विमुक्त समाजाच्या राजकीय, सामाजिक हक्कांसाठी आणि त्यांच्या विकासासाठी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त जामखेड येथे राज्यस्तरीय भटके...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts