पुणे – दिवाळी फराळाच्या नावाखाली राज्यातील कारागृहात प्रंचड मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप माजी खासदार व शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत कैद्यांच्या दिवाळी फराळाच्या साहित्याचे दर फलकचा फोटा ही पोस्ट केला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे की, दिवाळी फराळ कैद्यांना अमिताभ गुप्ता व जालिंदर सुपेकर यांनी १२०० रूपये किलोची काजूकतली खायला घातली मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही ……! राज्यातील कारागृहात कैद्यांच्या नावाखाली बड्या अधिका-यांनी रेशन व कॅन्टीन साहित्य खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी कैद्यांना दिवाळीमध्ये जे फराळाचे साहित्य दिले त्या फराळाच्या साहित्याचे दर हल्दीराम ,काका हलवाई व चितळे बंधू यांच्या दर पत्रकाप्रमाणे होते. प्रत्यक्षात कैद्यांना लोकल मार्केटमधील फराळ खरेदी करून देण्यात आला या दरामध्ये जवळपास ४० ते ६० टक्के तफावत होती.
गत दिवाळीत राज्यामध्ये जवळपास ५ कोटी रूपयाची खरेदी करण्यात आली आहे. सदरची खरेदी करण्यासाठी कोणतीही निवीदा प्रक्रिया करण्यात आली नाही. सोबत फराळाचे साहित्य व त्याचे दरपत्रक टाकले आहे यावरून कारागृहात किती अनागोंदी कारभार चाललेला आहे हे लक्षात येईल.असे त्यांनी सोशल मिडियावरील पोस्ट मध्ये म्हटले आहे.