मुंबई – गुजरातमधील एअर इंडिया बोईंग ७८७ विमान अपघातात तब्बल २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला असतानाही, भारतीय राष्ट्रीय मीडियाचे प्राधान्य ‘भगवद्गीता सुरक्षित आहे’ या बातमीला देण्यात आले. ही बातमी “ब्रेकिंग न्यूज” म्हणून चालवली गेली, आणि या घटनेने पुन्हा एकदा भारतातील मीडियाच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
भारतातील माध्यम स्वातंत्र्याचा निर्देशांक १५१ व्या क्रमांकावर पोहोचला असून, १८० देशांतील स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरील माध्यम स्वातंत्र्याचे मूल्यांकन करणाऱ्या ‘रिपोर्टर्स विथआउट बॉर्डर्स (RSF)’ या संस्थेच्या अहवालानुसार ही धक्कादायक घसरण नोंदवण्यात आली आहे. २०२३ मध्ये १६१, २०२४ मध्ये १५९ आणि आता २०२५ मध्ये भारताने १५१वा क्रमांक गाठला आहे. भारतातील डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) या हवाई सुरक्षेच्या प्रमुख संस्थेच्या ४८% जागा रिक्त आहेत. याचा अर्थ ही संस्था फक्त ५२% क्षमतेने कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या अपघातानंतर यंत्रणांची निष्क्रियता स्पष्ट होते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून माध्यमांनी ‘धार्मिक ग्रंथ वाचला’ ही गोष्ट मोठी केली, जी सरकारी स्क्रिप्टप्रमाणेच वाटते, असा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. याविषयी ट्विट करत त्यांनी म्हटले आहे की, “हवाई वाहतूक, पोर्ट्स, रेल्वे अशा सर्व गोष्टी खाजगीकरणाच्या नावाखाली अदानी-अंबानींना विकल्या जात आहेत. गुजरात पोर्टवर मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ (ड्रग्स) सापडत आहेत, तरीही माध्यमं गप्प राहतात. कारण, हे पोर्ट देखील अदानी यांच्याकडे आहेत.” सोशल मीडिया भाजपने हायजॅक केला आहे, इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया उद्योगपतींच्या हातात गेले आहेत, त्यामुळे ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या पत्रकारितेची विश्वसनीयता धोक्यात आली आहे, असा आरोपही त्यांनी केला. आज माध्यमांनी कोणती बातमी मांडावी, कोणती लपवावी आणि कोणती धार्मिक रंगात रंगवावी याचे निर्णय माध्यम संस्था नव्हे, तर सत्ताधारी पक्ष व उद्योगपती घेत आहेत, ही वस्तुस्थिती अस्वीकार करता येणार नाही. “माणसे मेली, परंतु ग्रंथ वाचला!” हे बातम्यांचे शीर्षक देशातील पत्रकारितेची गंभीर शोकांतिका दर्शवते, असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.