पुणे : डिसेंबर 2025 अखेरपर्यंत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात प्रधानमंत्री सूर्य घर योजना देखील प्रभावीपणे राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाऊर्जाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाऊर्जासाठी दोन उद्दिष्टे महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करण्याला गती देणार, तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजनेप्रमाणे त्या योजनेशी संलग्न असलेली राज्याची योजना सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक तर दुसऱ्या टप्प्यात 300 युनिटपर्यंतचे सर्व ग्राहक सौर ऊर्जेवर आणायचे आहेत. 300 युनिटपर्यंत वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज देयक शून्यावर यावे, असा प्रयत्न आहे. ही दोन्ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासंदर्भात महाऊर्जा हे काम चांगल्यारितीने करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीजेचे दर कमी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाऊर्जाने गेल्या काही वर्षात अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्यात चांगली कामगिरी केली आहे. 2026 च्या डिसेंबरपर्यंत कृषी क्षेत्राची संपूर्ण वीज मागणी सौर ऊर्जेवर परिवर्तित करू शकू. गेल्या 20 वर्षात दरवर्षी वीजेचे दर 9 टक्क्याने वाढवत आहोत. मात्र 2025 ते 2030 या कालावधीमध्ये दरवर्षी वीजेचे दर कमी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.