नवी मुंबई : रबाळे येथील साईबाबा नगर परिसरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी घणसोली एफ वॉर्डचे सहायक आयुक्त संजीव तडवी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी साईबाबा नगर परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन विविध समस्यांची पाहणी केली.
परिसरातील खराब रस्ते, साचलेले सांडपाणी, अनियमित पाणीपुरवठा तसेच गटारांच्या कामांशी संबंधित समस्यांची सविस्तर पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतले. आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पाहणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामे पूर्ण होईपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केली.
यावेळी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, युवराज सोनावणे, रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले, एम. डी. गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष आणि विकासासाठी सातत्याने पाठपुरावा या भूमिकेतून नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडत राहणार, जोपर्यंत साईबाबा नगरमधील समस्यांचे पूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचा पाठपुरावा आणि संघर्ष सुरूच राहणार असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.





