अकोला : गणेशोत्सवाची परंपरा जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा अनोखा उपक्रम शुक्रवारी अकोला शहरात पार पडला. तब्बल २० हजार विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीच्या गणेशमूर्ती साकारत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प केला. शहरातील चार ठिकाणी एकाचवेळी झालेल्या या भव्य कार्यशाळेमुळे अकोल्याच्या सामाजिक व पर्यावरणीय चळवळीला नवी दिशा मिळाली. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती होती.
अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निलेश देव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. गतवर्षी १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा हा आकडा दुप्पट करून २० हजारांवर नेण्यात आला.
अकोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तापडिया नगर, स्व. शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे पटांगण, जुने शहर, जानोरकर मंगल कार्यालय, रिंग रोड आणि प्रभात किड्स स्कूल, पातूर रोड या चार ठिकाणी एकाच वेळी कार्यशाळा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना शाडू मातीसह आवश्यक साहित्य देण्यात आले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार केल्या.
‘गणरायाची भक्ती मनात, संस्कृतीची परंपरा हृदयात आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी हातात’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळणे, शाडू मातीचा वापर करणे, घरच्या घरी विसर्जन करणे तसेच विसर्जनानंतर त्याच मातीत तुळशीसारखी रोपे लावणे, या पर्यावरणपूरक संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. मुख्य मार्गदर्शक व प्रशिक्षक शरद कोकाटे यांच्यासह प्रा. डॉ. ज्ञानसागर भोकेर, प्रा. गजानन बोबडे, कल्पना राव, अमृता सेनाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.
याच दिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तापडिया नगर येथे ‘तेजस्वी आत्मनिर्भर महाबाजार’चा शुभारंभ करण्यात आला. ‘महिलांच्या हाताला काम, उत्पादनाला बाजार आणि कष्टाला योग्य मोबदला’ या संकल्पनेतून ४ ते ६ सप्टेंबरदरम्यान हा महाबाजार आयोजित करण्यात आला आहे. हस्तकला, गृहउद्योगातील उत्पादने, घरगुती वस्तू, वस्त्र, खाद्यपदार्थ तसेच महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महाबाजाराच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सकाळी २० हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश, तर सायंकाळी महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून आत्मनिर्भरतेचा संदेश देत अकोल्याने सामाजिक परिवर्तनाचा दुहेरी आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाला प्रा. अंजलीताई आंबेडकर, अरुंधती शिरसाट, प्रमोद देंडवे, अनिल पिंपळकर, जयंतराव सरदेशपांडे, नगरसेवक निलेश देव, नगरसेवक पराग गवई, नगरसेविका जयश्री बहादुरकर, शेख शमशु शेख साबीर, नगरसेविका उज्वला पातोडे यांच्यासह अकोला महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमाला अकोला महानगरपालिका, सुखकर्ता पर्यावरणपूरक अभियान, स्व. शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, प्रभात किड्स स्कूल, इनर व्हील क्लब ऑफ अकोला क्वीन्स, बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय आणि जानोरकर मंगल कार्यालय यांचे सहकार्य लाभले. गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवत तो पर्यावरणपूरक बनविणे, संस्कृतीची मूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि महिलांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे, या त्रिसूत्री संदेशातून साकारलेला हा उपक्रम अकोल्यातील सामाजिक क्षेत्रातील आगळावेगळा प्रयोग ठरला.






