अमरावती: तिवसा तालुक्यातील सारसी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीवरून बौद्ध बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव तथा आंदोलक सागर भवते यांना प्रवेश नाकारण्यात आले. यामुळे बौद्ध बांधवांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
सारसी येथे २५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वार उभारण्याच्या मागणीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दावा बौद्ध बांधवांनी केला आहे. त्यानंतर या मागणीसाठी बौद्ध बांधवांच्या वतीने सकाळी ११ वाजेपासून रात्री १० वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले होते.
या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी तिवसा तहसीलदारांशी चर्चा केली होती. संबंधित प्रकरणी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रवेशद्वाराची मागणी करणाऱ्या दोन्ही अर्जदारांचे प्रतिनिधी तसेच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले होते, असे भवते यांनी सांगितले.
मात्र, ३१ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत प्रवेशद्वाराची मागणी करणाऱ्या दोन्ही गटांसह आंदोलक सागर भवते यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकाराचा निषेध करत बौद्ध बांधवांनी तहसीलदारांच्या भूमिकेविरोधात बैठकीवर बहिष्कार टाकला.
दरम्यान, प्रवेशद्वाराच्या या प्रकरणी आंदोलक सागर भवते यांच्यासह सारसी येथील सर्व बौद्ध बांधवांशी तालुका प्रशासनाने चर्चा करावी. चर्चा झाल्याशिवाय या प्रकरणी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी ठाम भूमिका बौद्ध बांधवांनी घेतली आहे.
सारसी येथे दीक्षाभूमीच्या धर्तीवर प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी २५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी तिवसा तहसीलदारांनी ३१ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन चर्चेद्वारे मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आज तहसीलदारांनी एका विशिष्ट समूहाच्या मागणीचे समर्थन केल्याने आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आमच्याशी चर्चा केल्याशिवाय या प्रकरणी कोणताही निर्णय घेऊ नये. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. आम्ही कायद्यानुसार रस्त्यावरची लढाई लढू,” असा इशारा सागर भवते यांनी दिला.






