यवतमाळ : आपल्या न्याय्य व मूलभूत मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद यवतमाळचे गटनेता व नगरसेवक डॉ. नीरज वाघमारे यांनी प्रत्यक्ष उपोषणस्थळी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्यानंतर डॉ. वाघमारे यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
विद्यार्थी हे समाजाचे भविष्य आहेत. ज्यांच्या हातात उद्याच्या समाजाची दिशा असणार आहे, त्याच विद्यार्थ्यांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी पाच-पाच दिवस उपाशी बसावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासनासाठी नव्हे तर संपूर्ण सरकारसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बैठक बोलावण्यात आली; मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक व अद्ययावत माहिती सादर न झाल्याने बैठक निष्फळ ठरल्याची बाब गंभीर आहे. प्रश्न केवळ एका बैठकीचा नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन नेमके किती गांभीर्याने पाहते, हा खरा प्रश्न असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले.
शिक्षकांच्या रिक्त पदांची स्थिती, २०२३ पासूनच्या नियुक्त्यांची माहिती, आरोग्य सेवकांची रिक्त पदे तसेच भरलेली व रिक्त पदे यांची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांकडून मागितली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. वाघमारे यांनी सवाल केला की, जर सरकार आणि प्रशासनाकडे ही सर्व माहिती उपलब्ध असेल तर ती विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यास अडचण काय? आणि जर ही माहितीच उपलब्ध नसेल, तर इतक्या वर्षांपासून संबंधित यंत्रणा नेमके काय करत होत्या?
आदिवासींच्या नावावर सत्ता; पण हक्कांसाठी आदिवासी विद्यार्थी उपाशी!
आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके हे याच यवतमाळ जिल्ह्यातील असताना, जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांसाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणे अत्यंत दुर्दैवी असल्याची रोखठोक प्रतिक्रिया डॉ. वाघमारे यांनी दिली.
आदिवासी समाजाच्या मतांवर सत्ता मिळवायची, आदिवासींच्या नावाने राजकारण करायचे; पण त्याच समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांसाठी उपाशी बसायला लावायचे, हे कसले आदिवासी विकासाचे धोरण आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी समाजाच्या अपेक्षांना न्याय दिलेला नाही. आश्वासने देऊन आदिवासी समाजाला फसवले गेले आणि आजही त्यांचे मूलभूत प्रश्न प्रलंबित ठेवून फसवले जात आहे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे,” असे डॉ. वाघमारे यांनी म्हटले.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हातात दगड किंवा शस्त्र नसून संविधानाने दिलेला लोकशाही मार्ग आणि न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने या आंदोलनाकडे केवळ एक उपोषण म्हणून न पाहता आदिवासी समाजाच्या अस्वस्थतेचा आवाज म्हणून पाहावे, असे त्यांनी सांगितले.
हा केवळ विद्यार्थ्यांचा आवाज नाही; हा आदिवासी समाजाचा आवाज आहे. हा शिक्षणाच्या अधिकाराचा आणि न्यायाचा आवाज आहे. तो दडपून किंवा दुर्लक्षित करून चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाच दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ न करता त्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन आवश्यक माहिती लेखी स्वरूपात द्यावी, रिक्त पदांच्या प्रश्नावर नियमानुसार ठोस कार्यवाही करावी आणि आंदोलन समाप्त करण्यासाठी संवेदनशील पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
डॉ. वाघमारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आश्वस्त करताना सांगितले की, “तुमचा संघर्ष एकटा नाही. तुमच्या प्रश्नांसोबत समाज उभा आहे आणि न्यायाच्या या लढ्यात वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. हा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून अन्याय, प्रशासकीय उदासीनता आणि अपारदर्शकतेविरुद्ध आहे.”
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास त्यांच्या न्याय्य आणि लोकशाही मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी राहील, असेही डॉ. नीरज वाघमारे यांनी स्पष्ट केले.






