मिरवणूक, उद्घाटन, चर्चा, पुस्तक प्रकाशन अशा भरगच्च कार्यक्रमाचा समावेश
अहमदनगर : भटके विमुक्त संयोजन समिती व भैरव क्रांती सेना महाराष्ट्र राज्य च्या वतीने सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साने गुरुजी स्मारक सभागृह दांडेकर पूल पुणे येथे राज्यस्तरीय भटके विमुक्त परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या भटक्या विमुक्त राज्यस्तरीय परिषदे चे उद्घाटन ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) चे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध लेखक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्त्या शैला यादव, भराडी समाजाच्या नेत्या सुमन सातपुते, मरीआईवाले समाजाच्या नेत्या संगीता निंबाळकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भटके विमुक्त समाजाचे नेते विजय जाधव हे या परिषदेचे स्वागताध्यक्ष आहे. (Nomadic and Vimukta)
अहमदनगर जिल्ह्यातील भटक्या विमुक्त समाजातील कार्यकर्ते संतोष चव्हाण, अजित भोसले, राजश्री लष्करे, ललिता पवार, सलीम मदारी, दया चव्हाण, अशोक शिंदे, मोहन चव्हाण, पुणे जिल्ह्यातील संग्राम माळवे, प्रकाश सावंत, दीपक पकाले, शंकर जाधव, दादा शिंदे, सुरेश शेगर, सुभाष सावंत, अतिश नाकोडे, तानाजी चौगुले, बाबासाहेब चव्हाण, ॲड. गोविंद राठोड, गोविंद अटक, पुरुषोत्तम पवार, चेतन शिंदे हे या परिषदेचे संयोजन समिती सदस्य आहेत.
सोमवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. सारसबाग येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी स्मारक सभागृहापर्यंत भटक्या विमुक्तां समाजातील पारंपारिक लोक कलावंतांच्या पारंपरिक वेशभूषा व वाद्य, नृत्य, संगीतासह भव्य मिरवणूक निघणार आहे.
Also Read : यवतमाळ: पाच दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; प्रशासकीय उदासीनतेविरुद्ध डॉ. नीरज वाघमारे आक्रमक
३१ ऑगस्ट १९५२ रोजी भटके विमुक्तांना स्वातंत्र्य मिळाले. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल ५ वर्षानंतर भटक्या व गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या जमातीला मिळालेले स्वातंत्र्य होय. भारत देशात पारतंत्र्यात जीवन जगत असलेल्या या समूहाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री असताना भटके विमुक्तांना मुक्त करण्याबाबत संसदेत ठराव घेऊन, ३१ ऑगस्टला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूरला येऊन सेटलमेंटच्या म्हणजेच खुले कारागृहाच्या तारेचे कुंपण तोडून भटके विमुक्तांना मुक्त केल्याचे घोषित केले. तेव्हापासून भटक्यांना विशेष मुक्त असे संबोधले जाते. ३१ ऑगस्ट हा आनंदाचा दिवस संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. पुणे येथे हा भटके विमुक्त दिन भटके मुक्त परिषदेच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. (Nomadic and Vimukta)
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लोकायत प्रकाशन व भटके विमुक्त संयोजन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या विमुक्त समाजातील विमुक्त जातीचा इतिहास आणि सद्यस्थितीवर आधारित संशोधनात्मक दस्ताऐवज ठरणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या पालावर जाऊन त्याच्या सामाजिक, राजकीय न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. डॉ. अरुण हिराबाई जाधव लिखित ‘विमुक्तांची पंचाहत्तरी’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास राज्यभरातील भटके, विमुक्त, जाती, जमाती मधील प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भटके विमुक्त समाजाच्या कार्यकर्त्या उमाताई जाधव, बापू ओहोळ, राकेश साळुंखे व सचिन भिंगारदिवे यांनी केले आहे.






