चंद्रपूर : जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासंदर्भातील सन २०२४ पासून प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी, महानगर चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय कार्यालय चंद्रपूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२४ पासून जन्म-मृत्यूच्या आदेशासंदर्भातील अनेक प्रकरणे उपविभागीय कार्यालयात प्रलंबित आहेत. अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही विविध कारणे दाखवून ही प्रकरणे निकाली काढण्यात आलेली नाहीत. आता सदर प्रकरणांचा निर्णय न्यायालयाकडे सोपविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी आर्थिक खर्च तसेच मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
जन्म-मृत्यू नोंदणीसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये विलंब झाल्याचा थेट परिणाम गोरगरीब व सामान्य नागरिकांवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. कार्यालयातील निवडणुकीचे कामकाज, SIR चे काम, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या आदी कारणांमुळे प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या सर्व बाबींचा सारासार विचार करून सन २०२४ पासून आजतागायत प्रलंबित असलेली जन्म-मृत्यूची सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी महानगर अध्यक्षा तनुजा रायपूरे, महासचिव मोनाली पाटील, उपाध्यक्षा इंदू डोंगरे, मंजुषा निरंजने, सचिव विद्या टेभरे, सुभाष ढोलने, सुभाष थोरात, डॉ. प्रज्ञाशील सहारे, पूजा धोटे, इला खोब्रागडे, शर्वरी फुलकर, शोभा वाघमारे, चंद्रप्रभा रामटेके, विश्रांती डांगे, ललिता दुर्गे, शालू खापर्डे आदी उपस्थित होते.






