अमरावती : अमरावती जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात झालेल्या दुर्घटनेत तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. ही घटना केवळ तांत्रिक बिघाडाचा परिणाम म्हणून न पाहता, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, उपकरणांची देखभाल आणि प्रशासनाच्या दुर्लक्ष आणि सरकारच्या कमिशन खोरीचा परिणाम असल्याची घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली. आज अमरावती येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.
शासनाच्या कमिशनखोरी व दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप करत, आरोग्यमंत्री आणि आरोग्य खात्याच्या प्रमुखांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केली आहे. (Amravati District Hospital Newborn Deaths)
घटनेचे प्राथमिक कारण संबंधित व्हेंटिलेटरमध्ये झालेला बिघाड किंवा स्फोट असल्याचे वृत्त समोर आले असले, तरी अधिकृत तांत्रिक तपासणी पूर्ण होईपर्यंत त्याला अंतिम कारण मानता येणार नाही, असे वंचितने स्पष्ट केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील वॉशिंग मशीन जळाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेचा सद्य दुर्घटनेशी काही संबंध आहे का, याचीही तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Also Read : Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!
वंचित बहुजन आघाडीने संबंधित व्हेंटिलेटरची कंपनी, मॉडेल, उत्पादन वर्ष आणि तांत्रिक तपशील तपासण्याची मागणी केली आहे. तसेच शिलर कंपनीची पात्रता आणि पूर्वानुभव, व्हेंटिलेटर रुग्णालयात कधी बसविण्यात आले, त्याची खरेदी कोणत्या प्रक्रियेतून झाली, कार्यान्वयन व स्वीकृती चाचणी झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपकरणाची नियमित प्रतिबंधात्मक देखभाल करण्यात आली होती का?, शेवटची तपासणी व दुरुस्ती कधी झाली?, विद्युत सुरक्षितता चाचणी करण्यात आली होती का?, तसेच नवजात अतिदक्षता विभागातील विद्युत जोडणी व विद्युत भाराची क्षमता योग्य होती का?, याचीही तपासणी आवश्यक असल्याचे वंचितने म्हटले आहे. लघुपरिपथ किंवा अन्य विद्युत बिघाड झाला होता का, आग शोधक व धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा कार्यरत होती का, अग्निशमन व्यवस्था व उपकरणे वापरण्यायोग्य स्थितीत होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय नवजात अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांना आगीच्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याचे आणि सुरक्षित स्थलांतराचे प्रशिक्षण देण्यात आले होते का, यापूर्वी अग्निसुरक्षा सराव घेण्यात आला होता का, रुग्णालयाची अग्निसुरक्षा तपासणी नियमितपणे होत होती का, तसेच अग्निसुरक्षा ना-हरकत प्रमाणपत्र व इतर वैधानिक सुरक्षा परवानग्या वैध होत्या का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Amravati District Hospital Newborn Deaths)
प्राणवायू व वैद्यकीय वायू वाहिनी व्यवस्थेत कोणताही तांत्रिक दोष होता का, दुर्घटनेनंतर धोक्याचा इशारा देणारी यंत्रणा, आपत्कालीन विद्युत पुरवठा आणि इतर सुरक्षा प्रणालींनी योग्य प्रकारे काम केले का, याचीही चौकशी व्हावी, असे वंचितने म्हटले आहे.
दुर्घटनेच्या वेळी नवजात अतिदक्षता विभागात नेमकी परिस्थिती काय होती, परिसरातील निगराणी कॅमेऱ्यांचे ध्वनिचित्रण, उपकरणांच्या नोंदी, विद्युत वितरण फलकाच्या नोंदी आणि देखभाल नोंदी तपासण्यात याव्यात. तसेच दुर्घटनेपूर्वी कोणत्याही सुरक्षा त्रुटी किंवा तांत्रिक बिघाडाची नोंद करण्यात आली होती का, याची माहितीही तपास यंत्रणेने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Also Read : धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भंडारा दुर्घटनेनंतरच्या उपाययोजना कुठे गेल्या?
भंडारा जिल्ह्यात दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानंतर सुचविण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजना अमरावती जिल्हा रुग्णालयात प्रभावीपणे राबविण्यात आल्या होत्या का, असा सवालही वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. भंडारा दुर्घटनेनंतर शासनाने केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नसल्यास त्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत आपली चिमुकली गमावणाऱ्या गायत्रीताई चोपडे, किरणाताई बेठेकर आणि पूजाताई बोरगे यांच्या कुटुंबीयांना शासनाने तातडीने समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. (Amravati District Hospital Newborn Deaths)
यावेळी प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, अमरावती जिल्हा प्रभारी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम उपस्थित होते.





