दोन वर्षांपासून मीटरअभावी बंद असलेली पथदिव्यांची व्यवस्था सुरू; कावड यात्रेपूर्वी शिवभक्तांना मोठा दिलासा
अकोला : श्रावण महिना आणि कावड यात्रा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर अकोला ते अकोट राष्ट्रीय महामार्गावरील हनुमान चौक ते तीन खांबे या कावड मार्गावरील पथदिव्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोल व दिवे बसवूनही केवळ वीज मीटरअभावी बंद असलेली प्रकाश व्यवस्था आता सुरू झाली असून संपूर्ण मार्ग रात्रीच्या वेळी प्रकाशमान झाला आहे. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश रामकृष्ण देव यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.
कावड यात्रेदरम्यान अकोला शहरातून हजारो शिवभक्त पायी कावड घेऊन अकोटकडे जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिवे सुरू असणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, दुभाजकातील पोल उभे करून दिवे बसविण्यात आल्यानंतरही वीज मीटर उपलब्ध नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून ही व्यवस्था बंद होती.
हा प्रश्न लक्षात घेऊन निलेश देव यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग, अकोला महानगरपालिका, महावितरण तसेच जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. “कावड यात्रेपूर्वी पथदिवे सुरू झाले पाहिजेत; अन्यथा आंदोलन करू,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला होता.
या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित यंत्रणांनी कार्यवाहीला गती दिली. अखेर वीज मीटर बसविण्यात आले असून विद्युत जोडणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे हनुमान चौक ते तीन खांबे या मार्गावरील पथदिवे प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.
दरम्यान, या मार्गावरील पथदिव्यांचे काम यापूर्वीच पूर्ण झाले होते. राष्ट्रीय महामार्ग विभागाने दि. ७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या पत्रात काम पूर्ण झाल्याचे नमूद केले होते. मात्र, प्रत्यक्ष विद्युत पुरवठा सुरू न झाल्याने तयार झालेली सुविधा वापरात येत नव्हती. अखेर मीटरचा प्रश्न निकाली निघाल्याने दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकाश व्यवस्था आता नागरिकांच्या सेवेत आली आहे.
शिवभक्तांकडून प्रशासनाचे आभार
कावड यात्रेपूर्वीच मार्गावरील पथदिवे सुरू झाल्याने शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अकोला महानगरपालिका, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शिवभक्तांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच हा प्रश्न सातत्याने लावून धरून प्रशासनाकडे पाठपुरावा करणारे नगरसेवक निलेश देव यांचेही शिवभक्तांनी आभार मानले आहेत.
“शिवभक्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने हा विषय सातत्याने मांडला. केवळ मीटरअभावी दोन वर्षांपासून बंद असलेली प्रकाश व्यवस्था अखेर सुरू झाली, याचे समाधान आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार. कावड यात्रेकरूंचा प्रवास आता अधिक सुरक्षित होईल,” अशी प्रतिक्रिया निलेश देव यांनी व्यक्त केली. कावड यात्रेच्या पार्श्वभूमीवर पथदिवे सुरू झाल्याने “दोन वर्षांचा अंधार दूर झाला; शिवभक्तांच्या कावड मार्गावर अखेर प्रकाश आला,” अशी भावना नागरिक व शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे.






