हिंगोली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू असलेल्या विरोधाला अधिक तीव्रता आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीत देणार नसल्याची ठाम भूमिका वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा समन्वयक अनिल कांबळे यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार बांगर यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला वाढवून दिला तर जमिनी द्याव्यात, अशी भूमिका मांडली. मात्र या भूमिकेला अनिल कांबळे यांनी आक्रमकपणे विरोध केला. “मोबदला कितीही वाढवून दिला तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. प्रश्न केवळ मोबदल्याचा नसून शेतकऱ्यांच्या शेतीचा, उपजीविकेचा आणि भवितव्याचा आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे,” अशी ठाम मागणी अनिल कांबळे यांनी केली.
Also Read : फक्त ध्वजारोहणासाठी पालकमंत्री नकोत; जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हवेत : वंचित बहुजन आघाडी
तसेच या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहावे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या भावना आणि परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शक्तिपीठ महामार्गाबाबत निर्णय होईपर्यंत हिंगोली जिल्ह्यात शेतीची मोजणी करू नये, अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना दिली.
पालकमंत्र्यांच्या या निर्देशामुळे मोजणीच्या प्रक्रियेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अंतिम मागणी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचीच असल्याचे अनिल कांबळे यांनी स्पष्ट केले. “पालकमंत्र्यांनी निर्णय होईपर्यंत मोजणी करू नये, अशी भूमिका घेतली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करणे हाच अंतिम निर्णय असला पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,” असे अनिल कांबळे यांनी स्पष्ट केले.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी आणि वंचित बहुजन आघाडी ठाम असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






