मुंबई : महाराष्ट्रात पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या शिक्षक भरतीमध्ये तसेच पोलीस भरती प्रक्रियेत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) घटकांच्या जागा जाणीवपूर्वक कमी अथवा शून्य दाखवून मागासवर्गीय तरुणांवर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. या गंभीर प्रश्नावर पक्षाच्या राज्य कमिटीने ठामपणे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला असून, पवित्र पोर्टलची जाहिरात तत्काळ मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.
राज्यभरात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामध्ये जाणीवपूर्वक अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी समाजाच्या जागा कमी करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्रात झालेल्या पोलीस भरतीमध्येही सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये या मागासवर्गीय घटकांसाठीच्या जागा थेट ‘शून्य’ दाखवून भरती पार पाडली आहे, असा थेट आरोप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.
या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याचे ठरवले आहे. शासनाने पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीची जाहिरात तत्काळ मागे घ्यावी, पोलीस भरतीतील या प्रकाराची योग्य चौकशी व्हावी आणि रोस्टर (बिंदू नामावली) पद्धतीचे काटेकोर पालन करूनच आरक्षणानुसार नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात यावी, अशी जोरदार मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारकडे करण्यात येत आहे. सरकारने या मागण्या त्वरित मान्य न केल्यास वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात या अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून राज्यव्यापी आंदोलन करेल, असा स्पष्ट इशारा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे.





