चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यात दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून शासनाने योग्य नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, चाळीसगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये तातडीने संयुक्त पंचनामे करणे, पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, पीक विम्याचा लाभ मिळवून देणे, कृषी कर्जवसुलीस स्थगिती देणे तसेच नुकसान झालेल्या शेती, शेतरस्ते आणि बांधांच्या पुनर्बांधणीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष संदीप (अण्णा) कांबळे, चाळीसगाव शहराध्यक्ष सागर जिभाऊ निकम, तालुका महासचिव गौतम रतन निकम, उपाध्यक्ष चेतन पवार, उपाध्यक्ष मनोज कमलाकर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते नारायण पाटील, प्रशांत मोरे, तुषार मोरे, प्रदीप मोरे, हेमराज पाटील, शुभम गुजर, शशिकांत सोनवणे, सागर धनगर तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावेळी देण्यात आला.





