नवी मुंबई : नवी मुंबईतील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आ) गटाला खिंडार पडले असून दिघा विभागाचे कार्याध्यक्ष अनिल अंगरख यांनी मंगळवारी (दि.४ ऑगस्ट) रोजी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर आणि नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाने स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दिघा परिसरात आरपीआय (आ) च्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय काम करणारे अनिल अंगरख यांचा हा निर्णय आरपीआयसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावी व्यासपीठ हवे” –
पक्षप्रवेशानंतर बोलताना अनिल अंगरख म्हणाले, “गोर-गरीब, वंचित, दलित आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडीचा विचार मला पटला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज या कुटुंबात प्रवेश करत आहे. दिघा परिसरातील सामाजिक कामे अधिक जोमाने करू.” वंचितच्या नेत्यांनी अंगरख यांचे पक्षात स्वागत करताना सांगितले की, “अनिल अंगरख यांच्यासारखे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते पक्षाची ताकद वाढवतील. नवी मुंबईत वंचितचा जनाधार वाढत आहे.”
अंगरख यांच्यासोबत त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही वंचितमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेशावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, नवी जिल्हाध्यक्ष अश्वजित जगताप, महिला जिल्हाध्यक्षा शिल्पाताई रणदिवे, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, प्रसिद्धी प्रमुख संदीप वाघमारे, तालुका अध्यक्ष राजेश भालेराव तसेच पल्लवीताई शिंदे, विक्रांत कांबळे, सुरेश शिवशरण, महेश बनसोडे, विजय चंदनशिवे, रुपेश तोगरे, संभाजी वाघमारे, उमेश गायकवाड, सतीश शिवशरण, दिनेश गुप्ता, सुभाष गायकवाड, अनिल मुंदिनकेरी, सिद्राम कांबळे आदि नवी मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.






