नाशिक : शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक महानगरपालिका प्रशासनाविरोधात अनोखे तिरडी आंदोलन करण्यात आले. राजीव गांधी भवन येथील नाशिक महानगरपालिका कार्यालयासमोर हे आंदोलन पार पडले. या आंदोलनाची सर्वत्र चर्चा होत आहे.
राज्यातील सत्ताधारी मंत्र्यांनीही नाशिकमधील रस्त्यांची दुरवस्था मान्य केली असून, शहरातील खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. दररोज हजारो नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याने तातडीने रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान खड्ड्यांसाठी जबाबदार असल्याचा आरोप करत मंत्री, आमदार, महायुतीतील नगरसेवक आणि नाशिक महानगरपालिका प्रशासन यांची प्रतीकात्मक तिरडी काढण्यात आली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.






