मुंबई : अमित ठाकरेपेक्षा आमच्या आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ता प्रभावीपणे आपली मते मांडू शकतो आणि मांडत आहे. फरक फक्त एवढाच आहे की, जरी या मुलांकडे खूप जास्त टॅलेंट, क्षमता आणि मेरिट असलं तरी मीडिया स्पेस काहीच लोकांसाठी ‘Reserved’ असते. असे म्हणत आरक्षण आणि मेरिटवर बोलणाऱ्यांना हे का दिसत नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी ‘X’ पोस्टद्वारे केला आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले की, मी कोणाची खिल्ली उडवत नाही पण, आज देशभरात आरक्षण आणि मेरिट या मुद्द्यावर बोलले जात आहे. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या भाषणावर बोलावसे वाटते. आंबेडकरवादी चळवळीतून व्याख्याने ऐकणारा, चळवळीचे कार्यक्रम, उपक्रम आपल्या गाव-खेड्यात, गल्लीत राबवणारा एक कार्यकर्ता अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, सामाजिक भान जपत अन्याय-अत्याचाराविरुद्ध आणि समाज परिवर्तनावर परखड मत मांडू शकतो.
बहुजनवादी, आदिवासी, कामगार, डाव्या चळवळीतील विद्यार्थी त्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडतात. आताच CJP च्या आंदोलनातील मुले अत्यंत प्रभावीपणे बोलताना, सरकारला जाब विचारताना दिसले. ही सर्व मुले अमित ठाकरे यांच्यापेक्षा अधिक प्रभावीपणे मुद्दे मांडताना दिसली आहेत. त्यांना कोणी लिहून देईल, मग ते बोलतील, मग ते मांडतील, अशी वेळ त्यांच्यावर कधीही येत नाही. प्रश्नांचे आकलन, मते निर्भीडपणे मांडण्याचा, व्यक्त होण्याचा अभ्यास चळवळीतील कार्यकर्त्यांना असल्याचेही सुजात आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
तथाकथित मेनस्ट्रीम मीडिया विसरलेली भाषणे, मांडता न आलेले मुद्दे कव्हर करणे आणि त्याला महत्त्व देण्याचे काम करतात. पण याच्यापेक्षा कित्येक पटीने सक्षम असलेल्या चळवळीतील आणि आंदोलनातील लोकांना दाखवण्याची हिंमत का करत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित करत त्यांच्या योग्यतेचे श्रेय त्यांना कधीच दिले जात नसल्याचेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले.





