– संजीव चांदोरकर
जेन झी आंदोलनाच्या निमित्ताने !
(मी कॉलेजमध्ये शिकवत असताना विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या संवादावर आधारित एक जुनी पोस्ट )
“कोणताही समाज वा देश हायपोथेटिकली कोणताही वस्तुमाल / सेवा आयात करू शकतो. पण कधीही सामाजिक / राजकीय नेते दुसऱ्या देशातून आयात करू शकत नाहीत, ते त्या त्या समाजातच तयार व्हावे लागतात. म्हणून तुम्ही समाजकारण / राजकरणापासून दूर राहू नका”
आमच्या शैक्षणिक संस्थेत विद्यार्थ्यांच्या स्टुडंट कौन्सिलच्या निवडणुका होत.
विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच एक वर्ग असा असतो कि जो या निवडणुका त्यात होणारे सामाजिक / राजकीय वादविवाद हे सगळे “वेस्टफ़ूल” आहे असे मानतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत फक्त अभ्यासावर लक्ष द्यावे असे मानतो. अर्थात त्यांना घरात / बाहेर समाजकारण / राजकारण / ऍक्टिव्हिजम याबद्दल जे सांगितले जाते त्यातूनच ते येते
निवडणुकांच्या दिवसात एका लेक्चर मध्ये विद्यार्थ्यांनी आग्रहच धरला. राजकरण, निवडणुकांचे राजकारण यात विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत लक्ष घालावे कि नाही याबद्दल तुमची मते आम्हाला जाणून घ्यायची आहेत
विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे हे मान्य. पण फक्त सिलॅबस मध्ये आहे तेव्हढेच शिकले पाहिजे हे कोणी सांगितले ? शिक्षण नेहमीच बहुआयामी असते, असले पाहिजे.
त्यात तुमची सोशल स्किल्स, वादविवाद घालण्याची कौशल्ये, स्वतःची मते बनवणे, नेतृत्वगुण, विरोधी मतांबद्दल सहिष्णुता या साऱ्या गोष्टी देखील याच वयात शिकायच्या असतात
मुळात राजकारण हा “डर्टी वर्ड” आहे हे मनातून काढून टाका
प्रत्येक समाजातील / देशातील मध्यमवर्गाची हि जबाबदारी आहे कि त्याने मानवी अस्तित्वाच्या प्रत्येक क्षेत्रात विधायक नेतृत्व दिले पाहिजे
गेल्या तीस चाळीस वर्षात मध्यमवर्गामध्ये मुख्यप्रवाहातील समाजकारण / राजकारणाबद्दल घृणा तयार होणे हे दुःखदायक आहे, कणाहीन मध्यमवर्गीय प्रोफेशनल्समुळे / नोकरशहा / बँकर्स / आणि सर्वच क्षेत्रात फक्त होयबा , येस सर कार्यसंस्कृती तयार झाली. त्यामुळे आपल्या देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे
राजकारण म्हणजे काही दरवेळी झेंडे घेऊन मोर्चे काढणे नव्हे. साहित्य, कविता, नाटक, फिल्म्स यात सक्रिय राहून देखील तुम्ही समाज / राजकारणात सहभागी होऊ शकता.
तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी कराल त्याठिकाणी घटनेला स्मरून , नैतिक भूमिका घेऊन , कोणतेही बेकायदेशीर कृत्य करायला तुमच्या वरिष्ठांना नकार देणे देखील त्यात मोडते ! हे सामर्थ्य पुस्तके वाचून, डिग्र्या मिळवून येत नाही. वर्गाच्या बाहेर असणाऱ्या शाळा / कॉलेजमधून ते शिक्षण व्हावे लागते.
देशाला राजकीय पक्षांपासून सर्वच क्षेत्रात अतिशय जबाबदार, विचारी, सर्वसमावेशक, सहिष्णू नेतृत्व हवे आहे. आणि ते तरुणांमधूनच निपजत असते. तुम्ही सारे त्याचे प्रतिनिधी आहात.
एकच लक्षात ठेवा. कोणत्याच समाजात सामाजिक / राजकीय नेतृत्वाची निर्वात पोकळी कधीच राहू शकत नाही. शिकलेल्या / विचारक्षम / संवेदनशील व्यक्ती त्यात उतरल्या नाहीत तर दुसरे लोक त्यात उतरून ती पोकळी भरून काढणार
आणि कोणताच समाज / देश आपले नेते बाहेरून आयात करू शकत नाही
याउपर निर्णय तुमचा !




