मंगळवेढा : तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असतानाच कार्यरत शिक्षकांची मतदार पुनर्रचना (SRI) सर्वेक्षणासाठी बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शिक्षकांना बीएलओच्या कामातून तातडीने मुक्त करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष अजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी बी. आर. माळी आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मंगळवेढा तालुक्यातील १८३ शाळांमध्ये शिक्षकांची ७८ पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत कार्यरत असलेल्या १०१ शिक्षकांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे.
वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करून त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सध्या ज्या विभागांमध्ये कामाचा ताण कमी आहे, त्या विभागातील कर्मचाऱ्यांची या कामासाठी नियुक्ती करावी. तसेच तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या कामात संधी दिल्यास त्यांना रोजगारासह अनुभवही मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना या कामासाठी नियुक्त करून त्यांना मानधन देण्याचे नियोजन प्रशासनाने करावे, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनावर सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष दिपसागर पाराध्ये, युवा जिल्हा महासचिव सोमनाथ ढावरे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष अशोक माने, शहराध्यक्ष अजय गाडे, लखन शीकतोडे, अजित खंदारे, किशोर कसबे आणि वि. ना. शिवशरण यांच्या सह्या आहेत.
यावेळी शहराध्यक्ष अजय गाडे म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना हे ‘वाघिणीचे दूध’ म्हणजेच दर्जेदार शिक्षण मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे त्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखे आहे. त्यामुळे शिक्षकांना तातडीने बीएलओच्या कामातून मुक्त करून शिक्षणाला प्राधान्य द्यावे.”






