घणसोली, नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी नवी मुंबईतील रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील आदिवासी पाड्याला आजही मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि महाराष्ट्रातील श्रीमंत महानगरपालिकांमध्ये अग्रस्थानी असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीत हा भाग येतो. मात्र, येथील स्थानिक आदिवासी बांधवांना आजही अंधारात आणि दुरवस्थेत जीवन जगावे लागत असल्याने, वंचित बहुजन आघाडी नवी मुंबईच्या वतीने आज (७ जुलै २०२६ रोजी) घणसोली विभागाच्या सहायक आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या आदिवासी पाड्यातील अनेक कुटुंबांकडे अद्याप वीज पोहोचलेली नाही. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे पूर्णपणे मोडकळीस आली असून, त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या तुटून अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची मोठी शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या:
प्रशासनाने या गंभीर समस्यांकडे तत्काळ लक्ष देऊन खालील मागण्या पूर्ण कराव्यात, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे:
1) पाड्यात त्वरित विजेची (लायटीची) व्यवस्था करण्यात यावी.
2) परिसरातील गटारांचे नूतनीकरण करण्यात यावे आणि मोकळ्या जागेत पेव्हर ब्लॉक्स बसवण्यात यावेत.
3) परिसरातील कचरा नियमितपणे उचलण्यात यावा, तसेच पिण्याच्या पाण्याची टाकी नियमित साफ केली जावी.
4) नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या जुन्या व धोकादायक झाडांच्या फांद्या त्वरित छाटण्यात याव्यात.
5) पाड्यातील नागरिकांसाठी हक्काचे ‘समाज मंदिर’ बांधून देण्यात यावे.
श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असणाऱ्या नवी मुंबईत आदिवासी बांधवांवर हा अन्याय होत आहे. प्रशासनाने या मागण्यांकडे तत्काळ लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्यात. जर या मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत, तर घणसोली ‘F’ वॉर्डवर आदिवासी बांधवांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप, महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे, गणेश चौधरी, आकाश निमसरकार, महेश महाला, अनिकेत जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Navi Mumbai Tribal Hamlet Lacks Basic Amenities; VBA Submits Memorandum, Warns of Agitation






