नवी मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे पूर्ण होत आली असली, तरी रबाळे येथील एमआयडीसी साईबाबानगरमधील आदिवासी पाड्यात आजही नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले आहे. या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारणार असून, आवश्यक असल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) आर्थिकदृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतर (बीएमसी) दुसऱ्या क्रमांकाची, तसेच महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत हा आदिवासी पाडा येतो. मात्र, येथे आजही वीज आणि सार्वजनिक स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. (Navi Mumbai Tribal Hamlet)
Also Read : पुण्यात वंचित बहुजन युवा आघाडीने स्वखर्चाने लावला ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यान’चा नामफलक; महापालिकेच्या दिरंगाईचा निषेध
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आदिवासी पाड्यातील अनेक कुटुंबांना अंधारात जीवन जगावे लागत आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृह मोडकळीस आले असून त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. झाडांच्या फांद्या तुटून अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Navi Mumbai Tribal Hamlet)
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची नवी मुंबई टीम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करणार आहे. यासंदर्भात अधिकृत पत्रव्यवहार करण्यात येणार असून, प्रशासनाने दखल न घेतल्यास आदिवासी बांधवांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांनी दिली.






